
नदीपात्राची स्थिती तसेच रेती वाहतुकीचे मार्ग यांचा आढावा घेण्यात आला.
चंद्रपूर : भद्रावती तालुक्यातील पीपरी, जेना आणि पारोधी येथील लिलाव झालेल्या रेती घाटांची उपविभागीय अधिकारी (वरोरा) संदीप भस्के यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान संबंधित घाटांवरील उत्खननाबाबत माहिती घेत त्यांनी पुढील आदेश मिळेपर्यंत उत्खनन थांबविण्याचे निर्देश दिल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
या वेळी घाट परिसरातील परिस्थिती, उत्खननाची पद्धत, नदीपात्राची स्थिती तसेच रेती वाहतुकीचे मार्ग यांचा आढावा घेण्यात आला. संबंधित ठेकेदार व कामगारांना पुढील आदेश मिळेपर्यंत कामकाज बंद ठेवावे, अशा सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच अनधिकृत वाहतूक रोखण्यासाठी काही संवेदनशील मार्गांवर रस्त्यांवर नाले खोदण्याबाबतही निर्देश देण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, चारगाव परिसरातील वर्धा नदी तसेच पारोधी परिसरातील ईरई नदी भागात अवैध रेती वाहतुकीबाबत स्थानिक स्तरावर चर्चा होत असल्याचे नागरिक सांगतात. याशिवाय ग्रामीण भागातील काही लहान नाल्यांमधूनही रेती उत्खनन होत असल्याची चर्चा स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात कथित अवैध उत्खननावर आळा घालावा, अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गाकडून होत आहे. मात्र याबाबत अधिकृत स्तरावर स्वतंत्र पुष्टी झालेली नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
यापूर्वी भद्रावती तालुक्यात अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून विशेष भरारी पथक कार्यरत होते. या पथकाने विविध ठिकाणी तपासणी करून काही वाहनांवर कारवाई केली होती. मात्र सध्या अशा प्रकारच्या कारवाया पूर्वीइतक्या दिसून येत नसल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, वरोरा तालुक्यातील एका रेती घाटावर दोन गटांमध्ये झालेल्या वादातून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची नोंद असून या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. याशिवाय रेती उत्खनन व वाहतूक शासनाने निर्धारित केलेल्या नियमांनुसार आणि पर्यावरणीय अटींचे पालन करूनच पुढील काळात करण्यात यावी, असे निर्देश प्रशासनाने दिल्याचे समजते.


