
आर्थसंकल्पाची दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांनी बहुतांश तयारी केलेली होती.
आर्थिक वर्ष 2026-27 साठी राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. या आर्थसंकल्पाची दिवंगत अर्थमंत्री अजित पवारांनी बहुतांश तयारी केलेली होती. मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. हा अर्थसंकल्प अनेक बाबींनी खास आहे. यात महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्षे पुर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रम आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. तर राज्यात नवीन काही योजना सुरु केल्या जातील, अशी मोठी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली. यासह विविध घोषणा या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, या अर्थसंकल्पानुसार, महाराष्ट्रात काय स्वस्त आणि काय महाग झालंय, जाणून घऊया.
अर्थसंकल्पानुसार काय स्वस्त झालं?
कर्करोगवरील औषधं
मधुमेहावरील उपचार
वैद्यकीय उपकरणे
क्रीडा साहित्य
सौर पॅनल
काय महाग झालं?
सिगारेट
तंबाखूजन्य पदार्थ
दारु
अर्थसंकल्पातील 10 मोठ्या घोषणा
- महात्मा फुले यांच्या जन्माला 200 वर्ष पूर्ण होत आहे. यासाठी एक समिती स्थापन करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी निधी दिला जाईल. संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र विकसित करण्यात येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शताब्दी वर्षानिमित्त रायगड येथे पायाभूत सुविधा केल्या जातील. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं काम पूर्ण झालं आहे. ग्रामसमृद्धी अभियान राबवलं जाणार आहे.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु राहणार आहे. या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आली आहे.
- दिवंगत उपमुख्यमंत्री अजित त्यांना श्रद्धांजली म्हणून अजितदादा पवार यांचे भव्य स्मारक उभारले जाईल. त्यांच्या नावाने नागरी पुरस्कार सुरु केला जाईल.
- मुंबईत अजून एक भुयारी मेट्रो, अटल सेतू मुंबई विमानतळाला जोडणार, राज्यात 1 हजार 200 किमीचे मेट्रो मार्ग उभारणार, 6 हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित करणार, 2029 पर्यंत 165 किमी मेट्रो मार्गिका तयार करणार आहोत. दक्षिण मुंबईला 2028 पर्यंत समृद्धी महामार्गासोबत जोडणार, वर्सोवा-भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करणार, पनवेल ते कर्जत मार्ग अंतिम टप्प्यात लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार.
- कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येईल.
- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा मंजूर, 23 हजार पूलांचं काम हाती घेतलं आहे. मुंबई-पुणे जलदगती ट्रेनसाठी तरतूद करण्यात आली आहे.
- गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा हा सहभाग करणार, पाणंद रस्त्यांना मान्यता, 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे. चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात होणार आहे.
- राज्याचे नवे गुंतवणूक धोरण जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात सुक्ष्म व लघू केंद्र स्थापन केले जातील. सूक्ष्म, लघु आणि मध्य उद्योग केंद्र उभारणार आहोत. ५० लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे.
- मुंबईत केंद्राच्या मदतीने इंडियन इन्स्टिट्यूट क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरु, पुणे हे जीसीसीसाठी देशात सर्वाधिक पसंतीचे शहर आहे. जगात गेमिंग क्षेत्रात अव्वल होण्यासाठी महाराष्ट्रात 295 पेक्षा जास्त गेमिंग स्टुडिओ तयार करणार.
- सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ल्यावर पर्यटकांसाठी रोप वे प्रकल्प उभारणार आहोत. नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी उभारणार आहोत.


