
शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा
मागच्या काही दिवसापासून सुरु असलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीची घोषणा झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज मुंबईतील ब्ल्यू सी हॉटेलमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत अधिकृतपणे युतीची घोषणा केली. तब्बल २० वर्षांनंतर दोन्ही ठाकरे कुटुंब आणि दोन संघटना एकत्र आल्याने दोन्ही पक्षाच्या नेत्यांपासून ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.युतीच्या घोषणेपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. त्यानंतर पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी आपल्या भावना आणि युतीमागची भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा संदर्भ देत मराठी अस्मितेचा मुद्दा ठामपणे मांडला. त्यांनी सांगितले की, मराठी माणसाने मोठे बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ठाकरे घराण्याची भूमिका महत्त्वाची होती आणि त्याच परंपरेतून शिवसेनेचा जन्म झाला. “आमचे आजोबा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील पाच सेनापतींपैकी एक होते. माझे वडील, राजचे वडील आणि संपूर्ण ठाकरे घराणे त्या लढ्यात सहभागी होते,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे काय म्हणाले?
जे काही बाकी बोलायचं ते जाहीर सभेत बोलू. माझी एक मुलाखत झाली होती. मी मुद्दामहून आठवण करून देतो. त्यात मी म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. तिथून एकत्र येण्याची सुरुवात झाली. त्या वाक्यापासून झाली. कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रात सध्या लहान मुलं पळवण्याच्या टोळ्या फिरत आहे. त्यात दोन जास्त टोळ्या अॅड झाल्या. त्या राजकीय पक्षातील टोळ्या पळवतात. जे निवडणूक लढवत आहेत. त्या सर्व उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. कधी भरायची ती कळवली जाईल. महाराष्ट्र ही प्रतिक्षा करत होता. शिवसेना आणि मनसेची युती झाली हे जाहीर घोषणा करत आहोत.


