
जळगावसह महाराष्ट्रात सध्या नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे.
जळगाव । जळगावसह महाराष्ट्रात सध्या नागरिकांना प्रखर उन्हाचा सामना करावा लागत आहे. मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून अनेक शहरांमध्ये तापमानाने ४० अंशांची मर्यादा ओलांडली आहे. यामुळे वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असून, अंगाची लाहीलाही होत आहे. अशातच हवामानात बदल होणार असून महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा मोठा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला. विशेष जळगाव जिल्ह्यातही उष्णतेच्या लाटेसह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
काय आहे हवामान खात्याचा अंदाज
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नाशिक, जळगाव, संभाजीनगर आणि विदर्भातील जिल्ह्यांत १४ मार्चपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील. मात्र यानंतर १५ व १६ मार्च रोजी नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी आणि बीडला किरकोळ पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, जळगावात मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचे आग ओकने सुरू झाले असून दिवसाचा पारा झपाट्याने वर गेला आहे. मागच्या काही दिवसापासून जळगावचा कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या वर असल्याने जळगावकरांना उष्ण लाटेचा सामना करावा लागत आहे. उन्हाच्या झळा इतक्या तीव्र होत्या की, घराबाहेर पडणाऱ्या जळगावकरांची लाहीलाही होत आहे. सकाळपासून उन्हाचा चटका बसत आहे.
आगामी दोन दिवस जळगावात उष्णतेची लाट कायम राहणार असून यानंतर पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तविला आहे. १५ आणि १६ मार्च रोजी जळगावात अवकाळी पावसाचा अंदाज असून यामुळे यामुळे १५ मार्चपासून दुपारच्या कमाल तापमानात घट होऊन उन्हाचा चटका काहीसा कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.


