
कविता पाटील,उज्वलाताई बेंडाळे ,माधुरी बारी व दीपमाला काळे यांची नावेही चर्चेत;
जळगाव प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेत भाजप–शिवसेना महायुतीची सत्ता निर्विवादपणे स्थापन झाली असून भाजपचे ४६ तर शिवसेनेचे २३ असे एकूण ६९ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे महापौरपद भाजपकडे जाणार हे चित्र आधीच स्पष्ट झाले होते. त्यातच आज मुंबईत झालेल्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीत जळगाव महापालिकेसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिला आरक्षण जाहीर झाल्याने आता ओबीसी महिला महापौर होणार असल्याचे निश्चित झाले आहे.जळगाव शहराचे बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंप्राळा प्रभागातून निवडून आलेले, एकनिष्ठ व कट्टर कार्यकर्ता सागर जिजाबराव पाटील यांच्या पत्नी कविता सागर पाटील हे नाव सर्वाधिक चर्चेत आहे.
आरक्षण जाहीर होताच महापौरपदाच्या शर्यतीत राजकीय हालचालींना वेग आला असून महापौरपदाची समीकरणे स्पष्ट होताना दिसत आहेत. प्रभाग क्रमांक १२ मधून बिनविरोध निवडून आलेल्या, तसेच भाजपच्या जिल्हा महानगर अध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या उज्वलाताई बेंडाळे या महापौरपदाच्या सर्वाधिक प्रबळ दावेदार ठरत आहेत. संघटनात्मक कामाचा प्रदीर्घ अनुभव, पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाशी असलेला समन्वय आणि शहर पातळीवरील राजकारणाची जाण या बाबींमुळे त्यांचा दावा अधिक भक्कम मानला जात आहे.
दरम्यान, भाजपकडून इतर काही नावेही चर्चेत आहेत. प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आलेल्या दीपमाला काळे या अनुभवी नेत्या म्हणून ओळखल्या जातात, तर प्रभाग क्रमांक १० ‘ब’ मधील माधुरी अतुल बारी यांचे नावही महापौरपदासाठी चर्चेत आहे. मात्र पक्षांतर्गत वजन, संघटनात्मक ताकद आणि नेतृत्वाचा अनुभव लक्षात घेता उज्वलाताई बेंडाळे यांच्याच नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांमध्ये हालचाली वाढल्या असून आगामी महापौर निवडीकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. भाजपकडून अधिकृत घोषणा कधी होते, याकडे आता राजकीय वर्तुळ उत्सुकतेने पाहत आहे.


