
अपघातानंतर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींचे वाचणार प्राण : रस्ता सुरक्षेला मिळणार नवी दिशा
जळगाव : रस्ते अपघातानंतर जखमींच्या जीवितासाठी अत्यंत निर्णायक ठरणाऱ्या ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळावे यासाठी सरकारने. उपाययोजना केल्या आहेत. नव्या कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेअंतर्गत रस्ते अपघातातील जखमींना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. इतकेच नव्हे, तर अपघातग्रस्ताला तातडीने रुग्णालयात पोहोचवून प्राण वाचविणाऱ्या मदतनिसाला ‘राहवीर’ म्हणून २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
मोटार वाहन कायद्यात केल्या ६१ दुरुस्त्या
रस्ते सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात एकूण ६१ दुरुस्त्या करण्यात आल्या असून, यामुळे वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी होणार आहे.
अपघात आणि मृतांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न
कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेच्या माध्यमातून रस्ते अपघातांची संख्या तसेच अपघातांमुळे होणारे मृत्यू कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तातडीचे उपचार, नागरिकांना मदतीसाठी प्रोत्साहन आणि पीडित कुटुंबांना आर्थिक आधार या त्रिसूत्रीमुळे रस्ता सुरक्षेला नवी दिशा मिळू शकणार आहे.
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यास २५ हजार बक्षीस
रस्ते अपघातात जखमी व्यक्तीला तातडीने मदत करून रुग्णालयात पोहोचविणाऱ्या नागरिकाला सरकारकडून २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. ‘राहवीर’ या संकल्पनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या या प्रोत्साहनामुळे अपघातस्थळी मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. परिणामी अनेक अपघातग्रस्तांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे.
तातडीने उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा
या कॅशलेस वैद्यकीय उपचार योजनेमुळे रस्ते अपघातातील जखमी आणि त्यांच्या नातेवाइकांवरील आर्थिक ओझे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. अपघातानंतर उपचारासाठी लागणारा खर्च उभा करण्यासाठी होणारी धावपळ, कर्ज काढण्याची किंवा दागिने गहाण ठेवण्याची वेळ अनेक कुटुंबांवर येते; मात्र या योजनेमुळे अशी परिस्थिती टाळता येणार आहे. विशेषतः अपघातानंतरचा ‘गोल्डन अवर’ जीव वाचविण्यास अत्यंत महत्त्वाचा असतो.
हिट अँड रन : वारसांना दोन लाख नुकसान भरपाई
हिट अँड रन प्रकारातील अपघातात मृत्यू झाल्यास संबंधित मृताच्या वारसांना दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई दिली जाणार आहे. या तरतुदीमुळे अशा अपघातांतील पीडित कुटुंबांना तातडीचा आर्थिक आधार मिळणार असून, न्याय व मदतीची प्रक्रिया अधिक बळकट होणार आहे.
प्रायोगिक तत्त्वावरील योजना ठरली यशस्वी
ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती आणि तिला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले असून, त्यामुळे ही योजना यशस्वी ठरली. या पार्श्वभूमीवर आता ही योजना राष्ट्रीय स्तरावर राबविण्यात येणार आहे.ही महत्त्वाकांक्षी योजना लवकरच राष्ट्रीय स्तरावर लागू केली जाणार आहे. या निर्णयामुळे अपघातग्रस्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.


