
कार चालकांनी रस्त्यातच वाहने उभी केल्याने मोठी वाहतूक कोंडी
कट लागल्याच्या कारणावरून दुचाकी आणि कार चालकांनी रस्त्यातच वाहने उभी केल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही कोंडी सोडविण्यासाठी गेलेल्या वाहतूक पोलिसांवर दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी धाव घेत धक्काबुक्की केल्याची घटना रविवारी सायंकाळी आकाशवाणी चौकात घडली. याप्रकरणी अविनाश दिलीप शरमळे (वय २२) आणि शाईदास भगवान राठोड (वय २०, दोघेही रा. रामेश्वर कॉलनी) यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक तुळशीराम बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल आकाश गोसावी हे रविवारी सायंकाळी आकाशवाणी चौकात वाहतूक नियंत्रणाचे कर्तव्य बजावत होते. रात्री साडेआठच्या सुमारास मुरली मनोहर हॉटेलसमोर एका पांढऱ्या रंगाच्या कारसमोर एमएच १९ ईएन ५३१७ क्रमांकाची मोटारसायकल आडवी लावण्यात आल्याने रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
हा प्रकार लक्षात येताच दोन्ही पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेले. त्याठिकाणी तीन तरुण जोरजोरात वाद घालत असल्याचे दिसून आले. चौकशीदरम्यान मोटारसायकलस्वाराने कारने कट मारल्याचा आरोप केला. पोलिसांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न करत दोन्ही वाहन बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, याचा राग आल्याने संशयित तरुणाने पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
दरम्यान, संबंधित तरुणाने “तुम्ही कोण?”, “माझा कट लागला आहे”, “व्हिडिओ शूटिंग काढा” असे म्हणत पोलिसांच्या अंगावर धाव घेतली. पोलीस कॉन्स्टेबल आकाश गोसावी यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी त्यांना धक्काबुक्की केली. पोलिसांनी कशीबशी वाहतूक सुरळीत केली, मात्र तरुणांचा गोंधळ सुरूच होता. यानंतर पोलिसांनी संशयित तरुणांना दुचाकीसह शहर वाहतूक शाखेत आणले. तपासादरम्यान अविनाश शरमळे याच्या तोंडातून दारूचा उग्र वास येत असल्याने ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली असता, तो दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


