
भव्य आध्यात्मिक पर्वाचे साक्षीदार होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे.
धानोरा, ता. चोपडा : धानोरा हे शांत, साधे गाव आता एका भव्य आध्यात्मिक पर्वाचे साक्षीदार होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे. येथे उभारण्यात येत असलेले सतपंथ ज्योत मंदिराचे गृहगाभारा व जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले असून संपूर्ण परिसरात भक्तिभाव आणि उत्साहाची लाट उसळली आहे. प.पू महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेले हे कार्य केवळ मंदिर बांधकामापुरते मर्यादित नसून, धानोरा गावाला एक नवे धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख देणारे ठरत आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि पारंपरिक वास्तुशास्त्रानुसार केला जात आहे. गृहगाभाऱ्याचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले असून आतील कलाकुसर, शिल्पसजावट आणि मूर्ती प्रतिष्ठापनेची तयारी वेगाने सुरू आहे. राजस्थानहून विशेष आमंत्रित करण्यात आलेले मूर्तिकार रमेश जगदीश शर्मा आणि मूर्ती पेंटिंग कलाकार किशन रमेश शर्मा यांची टीम नवरात्रापासून अखंड परिश्रम घेत आहे. त्यांच्या हस्तकौशल्यामुळे मंदिरात प्रतिष्ठापित होणाऱ्या दशावतार मूर्तींना अद्वितीय सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज प्राप्त झाले आहे. खानदेशात प्रथमच दशावतार मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा धानोरा येथे संपन्न होणार असल्याने या कार्यक्रमाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
भगवान विष्णूंच्या दहा अवतारांचे एकत्रित आणि शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा होणे ही दुर्मिळ संधी मानली जाते. या सोहळ्याच्या निमित्ताने एप्रिल महिन्यात ‘श्री चतुर्विध महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. यात श्री गोपी गीत पारायण, महाविष्णू याग, दशावतार मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि वैदिक सनातन धर्म सम्मेलन यांचा समावेश असेल.
या संपूर्ण प्रकल्पाकडे महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज जातीने लक्ष देत असून प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करत आहेत. मंदिर केवळ पूजास्थळ न राहता आध्यात्मिक शिक्षण, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचे केंद्र बनावे, अशी त्यांची भूमिका आहे.
त्यामुळे या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासोबतच वैदिक सनातन धर्म सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये धर्म, संस्कृती आणि राष्ट्रनिर्माण यासारख्या विषयांवर चिंतन होणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी धानोरा, भुसावळ, फैजपूर, जळगाव, जांभोरा, दापोरी आदी परिसरातील भाविकांनी मनापासून सहकार्य केले आहे. सतपंथ ज्योत मंदिराचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व संचालक मंडळ तसेच स्थानिक अनुयायी यांनी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक पाठबळ देत हे कार्य यशस्वी केले आहे. गावातील युवकांनी स्वयंसेवक म्हणून जबाबदाऱ्या स्वीकारल्या असून महिलांनीही विविध नियोजन समित्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.


