
ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषद प्रथम
जळगाव : प्रशासकीय कामात वेगवानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या 150 दिवसांच्या विशेष ‘सेवाकर्मी ई-गव्हर्नन्स सुधारणा’ कार्यक्रमात जळगाव जिल्हा परिषदेने बाजी मारली असून राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत जळगाव जिल्हा परिषदेने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात ई-गव्हर्नन्सवर विशेष भर दिला जात होता. या यशामागे प्रामुख्याने विविध घटक कारणीभूत ठरले. कागदी फायलींचा प्रवास थांबवून संपूर्ण कामकाज डिजिटल करण्यावर भर, नागरिकांना विविध दाखले आणि सेवा घरबसल्या मिळाव्यात यासाठी यंत्रणा कार्यान्वित, सामान्य नागरिकांच्या तक्रारींची वेळेत दखल घेऊन त्या सोडवण्यासाठी ‘रिअल टाइम’ मॉनिटरिंग, प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी राबविलेली विशेष मोहीम
महत्वाची ठरली.
राज्य शासनाने जळगाव जिल्हा परिषदेच्या या मॉडेलचे कौतुक केले असून, यामुळे प्रशासकीय उत्तरदायित्व वाढल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानाधारित प्रशासन दिल्यास सामान्य माणसाचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होतो, हेच जळगाव जिल्हा परिषदेने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.‘‘ या यशात केवळ एका व्यक्तीचा सहभाग नाही. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या सांघिक प्रयत्नांचे फळ आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्य माणसाचे काम सोपे करणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.
– मीनल करनवाल,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जळगाव


