
धान्यातून प्रती कार्ड एक किलो धान्य कमी दिले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
धानोरा, ता. चोपडा : येथे रेशन वितरण व्यवस्थेबाबत गंभीर अनियमितता उघडकीस येत असून, परिसरातील काही रेशन वितरकांकडून कार्डधारकांची दिवसाढवळ्या फसवणूक होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला मिळणाऱ्या धान्यातून प्रती कार्ड एक किलो धान्य कमी दिले जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या वतीने गरीब व गरजू नागरिकांना मोफत किंवा अनुदानित दरात धान्य उपलब्ध करून देण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत गहू, तांदूळ आदी जीवनावश्यक धान्याचे वाटप शिधापत्रिकेनुसार केले जाते. मात्र धानोरा गावात काही रेशन दुकानदारांकडून प्रत्यक्ष वाटप करताना मापात कपात केली जात असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. अनेकांनी सांगितले की, कागदोपत्री पूर्ण धान्य दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात वजन केल्यास एक किलोपर्यंत तूट आढळते. बहुतांश लाभार्थी हे रोजंदारीवर काम करणारे किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील आहेत. त्यांच्यासाठी एक किलो धान्यही महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत दर महिन्याला होणारी ही कपात त्यांच्या कुटुंबाच्या अन्नसुरक्षेवर परिणाम करणारी ठरत आहे. काही ग्राहकांनी सांगितले की, वजन कमी दिल्याबाबत विचारणा केल्यास दुकानदारांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात किंवा पुढील वेळी धान्य न देण्याची भीती दाखवली जाते.
दरम्यान, या प्रकरणामुळे परिसरातील इतर रेशन दुकानदारांवरही संशयाची छाया पडली आहे. काही ठिकाणी ग्राहकांनी स्वतःचे वजनकाटे घेऊन जाऊन धान्य मोजण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. येथील रेशन वितरणातील कथित गैरप्रकारामुळे लाभार्थ्यांचा विश्वास डळमळीत झाला आहे. शासनाने दिलेल्या धान्याचा पूर्ण लाभ नागरिकांना मिळावा, हीच अपेक्षा आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


