
युद्धाचे परिणाम : महाराष्ट्रातील हजारो नागरिक अडकले
विदर्भातील ५००० तर ठाण्यातील २३ जण दुबईत अडकून
इराण-इस्रायल युद्धामुळे दुबई आणि सौदी अरेबियामध्ये महाराष्ट्रातील हजारो नागरिक अडकले आहेत. हवाई सेवा बंद झाल्याने पुणे, विदर्भ आणि शहापूरमधील प्रवाशांची चिंता वाढली असून भारत सरकारकडे मदतीची मागणी करण्यात येत आहे.
अमेरिका आणि इस्रायलचा इराणसोबत सुरु असलेल्या युद्धाचा भडका हळूहळू वाढताना पाहायला मिळत आहे. इराणने दुबईवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हवाई क्षेत्र बंद असल्याने विमानाचे उड्डाण बंद करण्यात आले आहेत. याचा परिणाम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील नागरिक परदेशात अडकले आहेत. पुणे, विदर्भ, शहापूर अशा अनेक भागांतील नागरिक अडकले असून स्वदेशी परतण्यासाठी भारताकडे मदतीची मागणी करत आहेत.
विदर्भातील ५ हजार नागरिक रमजान निमित्त गेले असता युद्धजन्य परिस्थितीमुळे सौदीत अडकले आहेत. शिवाय ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील २३ ज्येष्ठ नागरिक देखील अडकल्याची माहिती समोर आली आहे. हे नागरिक देखील फिरण्यासाठी टूर्स च्या मध्यमातून दुबईला गेले होते. २८ फेब्रुवारी रोजी रात्री १२:४५ वाजता फ्लाइटने ते स्वदेशी परतणार होते. मात्र या युद्धामुळे विमान सेवा रद्द झाली असल्याने हे सर्व भारतीय नागरिक दुबईतील ए 1 फहादी स्ट्रीटवरील ग्रँड अॅस्टोरिया हाॅटेलमध्ये थांबले आहेत.या नागरिकांच्या नावांची यादी देखील समोर आली आहे. याचा फटका सर्वसामान्यांसोबत अभिनेत्री आणि खेळाडूंना देखील बसला आहे.
इराणची राजधानी तेहरानवर इस्रायलकडून पहिला हल्ला करण्यात आला. या युद्धाची ठिणगी शनिवारी दुपारपासून पडली. तेहरानसह इराणच्या अनेक भागांत इस्रायलने आतापर्यंत २०० हून अधिक हल्ले केले आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या १० मोठ्या शहरांवर भीषण हवाई हल्ले केलेत.
या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील संघर्ष तीव्र झाला असून संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण पसरले आहे. या युद्धाजन्य परिस्थितीचा जगभरात परिणाम होत आहे. अनेक विमाने रद्द झालेली आहे. भारतामध्येही याचा परिणाम दिसून आला. दिल्ली, मुंबई, पुण्यातून आखाती देशातील विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे अनेक नागरिक प्रदेशात अडकून आहेत. दरम्यान भारतीय नागरिकांनी घाबरून न जाता शांततेने परिस्थितीला सामोरे जाण्याचे आवाहन सरकारने केले आहे.


