
सुमारे २१० कि.मी. नाले व नदीपात्रांचे खोलीकरण आणि रुंदीकरण होणार; लोकसहभागातून उपक्रम
जळगाव । धरणगाव तालुक्यात वारंवार उद्भवणाऱ्या दुष्काळ आणि पुराच्या दुश्चक्रावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी ‘जलसंकल्प धरणगावचा’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून सुरू करण्यात आला असून भविष्यातील जलसंकट टाळण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. नाला खोलीकरण म्हणजे शेतीच्या भविष्यासाठीचा विमा आहे. नाला खोलीकरणातून पाणी थांबते, पाणी जमिनीत मुरते आणि त्यामुळे विहिरी व बोअरवेल जिवंत राहतात. नाल्यातील गाळ हा काळ्या आईचं सोनं असून तो शेतात गेला तर जमिनीची सुपीकता वाढते. या कामासाठी शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार येणार नाही. ही योजना शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी असून सर्वांनी या उपक्रमाला भरघोस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेतून आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून पाळधी – चांदसर जि.प. गट (टप्पा क्र. १) अंतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या लाडली येथील फार्म हाऊस परिसरात शुभारंभानिमित्त आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात पालकमंत्री बोलत होते.या कार्यक्रमाला जैन इरिगेशन सिस्टीमचे चेअरमन अशोक जैन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, डीआरडीएचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी , इंफ्राचे संचालक आश्विन अग्रवाल व सर्व्हे टिम अरुण घाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.


