अकलूद शिवारात 10 ते 16 मार्चदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
भुसावळ – भुसावळजवळील अकलूद शिवारात 10 ते 16 मार्चदरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुश्राव्य वाणीतून शिवपुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेसाठी राज्यभरातून अंदाजे आठ ते दहा लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने भुसावळ शहरातील रस्त्यांवर मोठी गर्दी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर यावल रोडवरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा ते कथा स्थळ या मार्गावरील सर्व अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
बुधवारी (4 मार्च) प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.शिवपुराण कथेच्या अनुषंगाने आज किंवा उद्यापासून शहरातील गांधी पुतळा ते कथास्थळ या मार्गावरील सर्व टपऱ्या, हातगाड्या व अतिक्रमित दुकाने हटवून रस्ता मोकळा करण्यात येणार आहे. संबंधित विभागांना याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
कथास्थळी झालेल्या या बैठकीस फैजपूरचे प्रांताधिकारी बबन काकडे, डीवायएसपी केदार बारबोले, फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे, तहसीलदार नीता लबडे, वाहतूक शाखेचे अधिकारी उमेश महाले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.बैठकीदरम्यान भाविकांसाठी वाहतूक व्यवस्था, सुरक्षा, पाणी, पार्किंग तसेच इतर मूलभूत सोयी-सुविधांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.