
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक जिल्हाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती
अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिर येथे गुरुवार, दि. 19 मार्चला केंद्रीय कृषीमंत्री ना. शिवराजसिंहजी चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत अक्षय कृषी परिवार व मंगळ ग्रह सेवा संस्था अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भूमी सुपोषण चळवळीचा राष्ट्रीय शुभारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार, दि. 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री मंगळग्रह मंदिर येथे सुमारे दोन तासांची प्रशासकीय मेगा बैठक झाली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, पोलीस उपअधीक्षक विनायक कोते, जिल्हा कृषी अधीक्षक के. एन. तडवी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, बीडीओ एन. आर. पाटील, मुख्याधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी सी. डी. साठे, कृषी विभागाचे उपसंचालक भरत इंगळे, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता टी. एच. नेमाडे व उपकार्यकारी अभियंता नितीन चौधरी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश ताडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, निवासी नायब तहसीलदार सी. यू. पाटील, नायब तहसीलदार ए. पी. कुलकर्णी तसेच शासकीय यंत्रणेतील जवळपास सर्वच विभागांचे जबाबदार अधिकारी व कर्मचारीही उपस्थित होते. मंदिराच्या अभिषेक गृहात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसह बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.
जिल्हाधिकारी श्री. घुगे यांनी जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. सर्व कृषी अधिकाऱ्यांनी भूमी सुपोषणाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी केलेले व करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी श्री. घुगे यांनी सांगितले, की देशातील कृषी क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही चळवळ खरे तर लोकचळवळ आहे. मात्र, या चळवळीला शासकीय पाठबळ मिळाल्यास ती अधिक प्रभावी व व्यापक होईल.
त्यासाठी प्रशासनातील सर्वच विभागांनी आपापल्या परीने प्रयत्न करायचे आहेत. अमळनेरकडे येणारे व बाहेर पडणारे सर्व रस्ते परीक्षण करून रस्त्याबाबतच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करण्याचे आदेशही श्री. घुगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. सती माता मंदिराजवळील बोगदा व रस्ता या समस्येबाबतही त्यांनी युद्धपातळीवर मार्ग काढण्यास सांगितले. सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अग्निशामक दल, ॲम्बुलन्स, पुरेसे पोलीस दल आदींबाबतही श्री. घुगे यांनी सूचना दिल्या. सर्वच विभागाचे अधिकारी त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्तीसाठी करीत असलेले व करणार असलेले प्रयत्न आदींची माहिती जाणून घेतली. सर्व अधिकाऱ्यांनी अत्यंत समाधानकारक प्रतिसाद दिला.
श्रीमती करणवाल यांनी सांगितले, की कृषी क्षेत्रातील सर्वच घटकांपर्यंत जावून या उपक्रमाची माहिती व उपयुक्तता पटवून दिली पाहिजे. त्यांनी काही महत्वाच्या सूचनाही दिल्या.मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी कार्यक्रमाचे व उपक्रमाचे एकूणच सर्व स्वरूप सांगितले. 19 मार्चचा कार्यक्रम देशातील सर्व कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालये तसेच देशातील प्रमुख 600 जिल्ह्यांमध्ये थेट प्रक्षेपित केला जाणार आहे. त्यासाठीची सर्व तांत्रिक तयारी जवळपास पूर्ण झाली आहे, अशी माहितीही डॉ. महाले यांनी दिली.


