
भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे.
मध्य-पूर्वेतील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे, कारण तेल आणि नैसर्गिक वायु पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये इंधनाची कमतरता निर्माण झाली आहे. अशातच आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठीचा कालावधी आणखी वाढवला आहे. याचा फटका थेट सर्व सामान्य जनतेला बसणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गॅस सिलिंडर बुकिंगचा कालावधी 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी (हॉर्डिंग) रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेताना सरकारने हेही स्पष्ट केले आहे की सध्या घरगुती गॅस, डिझेल किंवा पेट्रोलचा कोणताही तुटवडा नाही. मात्र साठेबाजीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या निर्णयाचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने तीन दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडर बुकिंगचा कालावधी 15 दिवसांवरून 21 दिवस केला होता. आता तो आणखी वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन सिलेंडर बुकिंगच्या दरम्यान किमान 24 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. म्हणजे जर तुम्ही 1 तारखेला शेवटचा बुक केला असेल तर आता तुम्हाला 25 तारखेआघी सिलिंडर बुक करता येणार नाही.
मुंबईमध्ये नॉन-सब्सिडी एलपीजीची किंमत 912.50 रुपये झाली आहे. तर कोलकातामध्ये ही किंमत 939 रुपये झाली आहे. तसेच चेन्नईत 14 किलोंच्या सिलिंडरसाठी 928.50 रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावरील ताण वाढला आहे. तसेच हॉटेल आणि रेस्टॉरंटसारख्या ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल एलपीजीच्या 19 किलोच्या सिलेंडरच्या किंमतीत 114.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता या सिलेंडरची किंमत 1,883 रुपये झाली आहे.
भारतामध्ये सध्या तरी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकारच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या तरी पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात येणार नाहीये. सध्या युद्ध सुरू आहे, कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात, मात्र अशाही परिस्थितीमध्ये देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तसेच ज्या प्रमाणे पट्रोल, डिझेलच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होणार नाही, त्याच प्रमाणे इंधनाचे दर कमी देखील होणार नाहीयेत, कारण सध्या पेट्रोल, डिझेलवर असलेली एक्साइज ड्यूटी कमी करण्याचा कोणताही विचार केंद्र सरकारचा नाहीये. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या देशात पुरसा इंधनाचा साठा आहे. जेव्हा मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाला त्याच्या पहिल्या दिवसापासूनच केंद्र सरकारकडून इंधनाच्या सोर्सवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं होतं, अशी माहिती देखील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमती वाढतच आहेत. दरम्यान भारतानं इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी वाढवली आहे.
पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर कमर्शियल सिलेंडरच्या किंमतीत 114.5 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या वेबसाइटनुसार राजधानी दिल्लीत आता 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलेंडर 913 रुपयांना मिळत आहे, जो यापूर्वी 853 रुपयांना मिळत होता. गेल्या एका वर्षात एलपीजी सिलेंडरच्या किंमती वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. हे नवीन दर 7 मार्चपासून लागू झाले आहेत.


