
रूपाली चाकणकरांच्या अटकेची मागणी..!
अशोक खरात या भोंदू बाबाशी महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचे अत्यंत कौटुंबिक संबंध होते. मिरगाव येथील शिवनिका संस्थानच्या ट्रस्टवर रूपाली चाकणकर ट्रस्टी होत्या. त्यांचे एवढे जवळचे संबंध होते की, वाढदिवसाला त्यांची पाद्य पूजा चाकणकर यांनी केली होती. तसेच त्यांच्या डोक्यावर त्या छत्री देखील धरायच्या. त्या म्हणायच्या की माझ्या आई-वडिलांनंतर कोणी असेल तर ते अशोक खरात हेच आहेत. रूपाली चाकणकरांनी अशोक खरात यांना पांडुरंगाची उपा दिली तर त्यांच्या पत्नीला रुक्मिणीची उपमा दिली होती.
आम्ही वारकरी संप्रदायाचे आणि खरात कुटुंब ही वारकरी संप्रदायाचे, अशी उपमा देऊन त्यांचा गौरव केला. एक वर्षापूर्वी खबरदार पुढारीच्या संपादकाने अशोक खरातची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला तर रूपाली चाकणकर यांनी कलेक्टर, पोलीस अधीक्षक यांना पत्र देऊन खबरदार पुढारीच्या संपादकावर दबाव आणला. एवढेच नव्हे तर त्याला एक वर्षानंतर माफी मागायला भाग पाडले. हे सर्व रूपाली चाकणकर यांनी स्वतः महिला आयोगाच्या लेटरहेडवर पत्र देऊन दबाव आणला. हा दबाव आणण्याचे कारण काय? आता ज्या पद्धतीने खुलासा केला जात आहे, त्यात “वैयक्तिक लाईफ कुणी पाहिली आहे. तो असा बदमाश निघेल कुणाला माहित? म्हणून आता मी डीजींना पत्र देते की त्यांची कसून चौकशी करा!” आता असे म्हणणाऱ्या रूपाली चाकणकर यांनी एक वर्षापूर्वी डोळे झाकून खबरदार पुढारीच्या संपादकाला धमकावले कसे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
रूपाली चाकणकर पत्रकार परिषद घेऊन जे फोटो माध्यमांमध्ये व्हायरल केले ते कसे चुकीचे आहेत, हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. तसेच ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत, त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून बडगा दाखवणार असे सांगितेल आहे. त्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे उत्तरादाखल म्हणाल्या की, अशोक खरात यांच्याबरोबर राहून कोट्यावधींची माया जमवणाऱ्या रूपाली चाकणकर यांनी नोटीस वगैरे देऊनच पहावे.. त्यानंतर खरात यांना अटक झाल्यानंतर रूपाली चाकणकरांनी दोन-तीन दिवस स्वतःचा राजीनामा देण्यासाठी जी नाटकं केली ती पाहता स्वतः राजीनामा देतील असे वाटले होते, पण शेवटी त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी केली तेव्हा त्यांनी आपला राजीनामा पोलीस प्रमुखांकडे देण्याऐवजी राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिला. तोही सिनेमांमध्ये पोच द्यावी त्याप्रमाणे हा हसरा फोटो होता. स्वतः सुनेत्रा पवारच राजीनामा देताहेत की काय अश्या थाटात चाकणकरांनी राजीनामा दिला.
तो शेवटी व्हायरल झालेला फोटो काढून त्या ठिकाणी दुसरा फोटो टाकण्यात आला असे म्हणतात. एकंदरीत रूपाली चाकणकरांचे अशोक खरात बरोबरचे विविध कारनामे पाहिले तर त्याच्या संपत्तीत त्यांचा वाटा असण्याची दाट शक्यता आहे; ती नाकारता येत नाही. एवढे होऊनही रूपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाला चिकटून राहण्याच्या तयारीत आहेत; यामागचे कारण काय? तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे अभय होय, असे म्हणतात ते खरे आहे.
रूपाली चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली. साध्या नगरपालिकेत निवडून येणाऱ्या चाकणकर यांना एकदम प्रदेश महिला अध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाची लॉटरी लागली. त्यामुळे त्यांना आकाश ठेवणे दिसायला लागले. अजित दादांना अशोक खरात प्रकरणी चाकणकरांची जवळीक आवडायची नाही, पण शेवटी नाईलाजास्तव ते गप्प राहायचे असे म्हणतात. शेवटी अजितदादांच्या अपघाताप्रकरणी जादूटोणा केल्याचा प्रकरणाचा आरोप देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे. चाकणकरांची महिला आयोग अध्यक्ष म्हणून कामगिरी सुमार होती. वैष्णवी हगवणे प्रकरणात तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. संपदा मुंडे प्रकरणी तिच्या चरित्रावर संशय घेतला गेला. महिला आयोग अध्यक्ष म्हणून त्यांची ही कामगिरी आहे. त्यांनी अशोक खरात बरोबर केलेले कारनामे पाहता त्यांना सह आरोपी करून तिच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्या कारवाई अंतर्गत त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. ही अटकेची मागणी रास्त आहे, असेच म्हणावे लागेल..!


