
जागतिक चिमणी दिनानिमित्त विद्यार्थ्याना पक्षी संवर्धनाचे धडे
पक्ष्यांचा आवाज हा निसर्गातील सर्वांत मधुर संगीत आहे. पहाटेच्या वेळी जेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडतो, तेव्हा मनात एक वेगळेच चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मात्र वाढत्या शहरीकरणामुळे हा आवाज हरवत चालला आहे. त्यासाठी पक्षी संवर्धनाची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे प्रतिपादन चातक निसर्ग संवर्धनाचे पक्षी अभ्यासक अनिल महाजन यांनी केले.
जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून शहरातील सिद्धेश्वर नगरमधील जिल्हा परिषद शाळेत ‘पक्षी वाचवा, निसर्ग वाचवा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध पक्षी व त्यांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती दिली. हतनूर जलाशय परिसरात सुमारे तीनशे प्रकारच्या चिमण्या आढळतात, तर काही विदेशातून येतात. मात्र चिमण्यांची घटती संख्या यावर चिंता व्यक्त करत, झाडांची संख्या कमी होणे, मोबाईल टॉवरचा किरणोत्सर्ग आणि अन्नाची कमतरता यामुळे चिमण्या नष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना विविध पक्ष्यांची ओळख करून देताना त्यांनी केवळ चिमणीच नव्हे, तर सुगरण, साळुंकी, सुतार पक्षी, कावळा, कोकीळा या पक्ष्यांच्या सवयी, त्यांची घरटे बांधण्याची पद्धत आणि त्यांच्या अन्नाचे स्रोत याबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत टाकाऊ वस्तूंपासून पक्ष्यांसाठी पिंजरे आणि पाण्याची भांडी तयार करून घरासमोरील झाडांवर टांगण्याचा सल्ला दिला.
विद्यार्थ्यांनी कुतूहलाने विचारलेल्या पक्ष्यांविषयीच्या प्रश्नांची त्यांनी सविस्तर उत्तरे दिली. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पक्षी हे अत्यंत महत्त्वाचे दुवे आहेत. आपण त्यांना सुरक्षित वातावरण दिले, तरच आपली पुढील पिढी हा किलबिलाट अनुभवू शकेल, असे महाजन यांनी यावेळी सांगितले.
इतिहासाचे अभ्यासक डॉ. अनिल पाटील यांनी सजीव सृष्टीमध्ये प्रत्येक घटकाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे स्पष्ट केले. झाडे, प्राणी, पक्षी आणि मानव हे सर्व एकमेकांशी बांधील आहेत. यातील एकही घटक कमी झाला, तर सजीव सृष्टीचे चक्र बिघडेल. त्यामुळे पक्षी, प्राणी आणि वनस्पती यांच्या संगोपनाची व संवर्धनाची जबाबदारी खऱ्या अर्थाने मानवाचीच असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजीराव देशमुख यांनी पक्ष्यांविषयी आवड निर्माण होण्यासाठी प्रत्यक्ष कृतीची गरज असल्याचे नमूद केले. घरासमोरील झाडावर किंवा घराच्या गच्चीवर पक्ष्यांसाठी पाणी व अन्न ठेवून त्याचा अनुभव घेतला पाहिजे. फक्त भाषण देऊन चालणार नाही, तर स्वतः सहभाग घेऊन इतरांनाही प्रोत्साहित केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. मंचावर केंद्रप्रमुख शिक्षक अनिल देशपांडे, विजय भोगे, शाम हेरोळे, रामकांत पाटील, शारदा सुरवाडे, उज्वला धांडे, ज्योत्स्ना कोचुरे आणि शुभांगी देवाजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती आवचारे यांनी केले.


