
सुनेत्रा पवारांची उमेदवारी बिनविरोध होईल का?
बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यापैकी बारामती येथील निवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरुवातीला अजित पवार यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन त्यांनी आपला अर्ज दाखल केला. ही निवडणूक अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर होत आहे. त्यामुळे हा भावनिक प्रश्न असून निवडणूक बिनविरोध व्हावी अशी सर्वत्र मागणी होत आहे. तथापि येथे काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी देण्याचा निर्णय काँग्रेस हाय कमांडने घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेसला रासप आणि वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा जाहीर केला आहे.
सध्या तरी काँग्रेस पक्षातर्फे मोरे नावाची व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू नये, ही निवड बिनविरोध करावी अशी मागणी होत आहे. प्रयत्न चालू आहेत. काय होते हे पाहायचे आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्याचा त्यांना अधिकार आहे. तो अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. परंतु पार्थ पवार यांनी जे वक्तव्य केले त्याबाबत शरद पवार यांनी ‘पार्थ पवार परिपक्व राजकारणी नाही’ असा टोला मारला. कुठल्याही निवडणुकीत निवडणूक लढविणे हा त्यांचा अधिकार आहे. तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. सुनेत्रा पवार यांनी महायुतीचा पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा जाहीर केला आहे. अद्याप शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतर्फे भूमिका जाहीर झालेली नाही. ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतु अजित पवारांच्या विरुद्ध निवडणूक लढवलेले युगेंद्र पवार यावेळी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी असून त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
त्यामुळे घरातल्या घरात जो निवडणूक लढवण्याचा योगेंद्र पवार यांचा पवित्रा होता तो आता न लढण्याबाबत स्पष्ट झाला आहे. त्यामुळे घरातल्या घरात निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक झालीच तर एकतर काँग्रेस पक्षाकडून आणि वंचित बहुजन आघाडी आणि रासपच्या वतीने लढण्यात येणार आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला असला तरी बिनविरोध निवडणूक होणे याला जी प्रतिष्ठा मिळते ती मिळणार नाही, एवढे मात्र खरे आहे. मागील लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी महायुतीच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यांच्या विरोधात सुप्रीत सुळे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. सुप्रिया सुळे यांनी निवडणुकीत टोकाचा प्रचार केला होता आणि दणदणीत मतांनी त्या विजयी झाल्या होत्या आणि सुनेत्रा पवार यांचा पराजय झाला होता. अटीतटीची झालेली ही लढत सुप्रीत सुळे यांनी एकतर्फी जिंकली होती.
हा पराभव अजित पवार यांच्या फार जिव्हारी लागला होता. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी त्याचा वचपा काढला आणि योगेंद्र पवार विरोधात दणदणीत विजय प्राप्त केला. पण दुर्दैवाने अजित पवार हे वर्षभरात अपघातात मरण पावले आणि सर्व चित्र बदलले. अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार यांना ही पोट निवडणूक लढवावी लागेल असे स्वप्नात सुद्धा कोणाला वाटले नसेल. परंतु त्यांनी बारामती पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या भावनिक प्रश्नाबाबत पवार कुटुंबीय हतबल झाले. सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्याशिवाय त्यांच्यासमोर गत्यंतर उरले नाही.
अजित पवार राज्याचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत. सडेतोड वक्तव्य करण्यात त्यांचा हातखंड होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची मैत्री वाखाणण्याजोगी होती. अचानक विमान अपघातात निधन झाल्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली. त्यांच्या अंत्यविधीला अख्खा महाराष्ट्र लोटला होता. बारामती मध्ये जिकडेतिकडे प्रचंड जनसमुदाय दिसत होता. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी ते जमले होते. संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात होती. त्यात हा अपघात की घातपात? असा प्रश्न उपस्थित झाला. त्यांचे पुतणे रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांसह हा घातपात कसा आहे, हे महाराष्ट्राला दाखवून दिले होते. अजूनही त्यांचे कवित्व थांबलेले नाही. पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस तपास करत आहेत.
अशा नाजूक प्रसंगी सुनेत्रा पवार यांच्यावर अजित पवारांची जबाबदारी आलेली आहे. त्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील झाल्या. पक्षाचे नेते, कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना शह देण्याचा प्रयत्न केला पण तो शह सुनेत्रा पवारांनी लिलया हाणून पाडला. उलट त्यांची नाचक्की झाली. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांची विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा सर्वांचा प्रयत्न आहे. पण प्रत्यक्षात काय होते हे पाहावे लागणार आहे. काही झाले तरी निवडून येणार सुनेत्रा पवारच, यात शंका नाही. पण हात दाखवून अवलक्षण जे म्हणतात ते काँग्रेस पक्षाकडून केले जात आहे. तो त्यांचा हक्क त्यांनी करणे प्राप्त आहे. माघार येईपर्यंत काय होते हे पाहावे लागणार आहे. माघारीपर्यंत अर्ज मागे घेतले नाही तर निवडणूक होईल. निवडणुकीला सामोरे जावे लागेल. पण सुनेत्रा पवारांनी जी सहानुभूती मिळणार आहे. ती प्रचंड अशी राहील एवढे मात्र निश्चित..!


