
चार वर्षांपासून त्या पदावर कार्यरत असताना संबंधित अधिकारी कार्यालयात नियमितपणे हजर राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.
मुक्ताईनगर प्रतिनिधी : मुक्ताईनगर तहसील कार्यालयात कार्यरत असलेल्या निवासी नायब तहसीलदार यांच्या अनियमित उपस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या पदावर कार्यरत असताना संबंधित अधिकारी कार्यालयात नियमितपणे हजर राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून वारंवार केली जात आहे.
कार्यालयीन वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित असताना, नायब तहसीलदार वेळेवर कार्यालयात येत नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. तसेच, सायंकाळीही कार्यालयीन वेळ पूर्ण होण्यापूर्वीच ते निघून जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही वेळा दुपारी किंवा सायंकाळी चार-साडेचारनंतरच त्यांची उपस्थिती दिसून येते, असा आरोपही करण्यात येत आहे.
या अनियमिततेमुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहत असून त्यांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. परिणामी नागरिकांमध्ये असंतोष वाढत असून, तहसील कार्यालयातील कामकाजावरही त्याचा परिणाम होत आहे. यामुळे तहसीलदारांनाही प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा आहे.
नागरिकांनी तहसीलदारांकडे याबाबत विचारणा केली असता, “तक्रार करा” असा सल्ला देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना कोणाचे राजकीय पाठबळ आहे का, असा प्रश्नही नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.
दरम्यान, नायब तहसीलदार कार्यालयात केव्हा दिसतील याबाबत नागरिकांमध्ये चर्चाच नव्हे तर एकप्रकारे “शर्यत” लागल्याचेही चित्र दिसत आहे. यावरून परिस्थितीची गंभीरता लक्षात येते.नागरिकांनी प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत शिस्त लावावी आणि प्रलंबित कामे मार्गी लावावीत, अशी मागणी केली आहे.


