
शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
भुसावळ प्रतिनिधी : शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर भुसावळमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपच्या नगरसेवकांवर थेट आरोप करत, “भुसावळच्या विकासाला मुद्दाम अडथळे निर्माण केले जात आहेत,” असे स्पष्टपणे सांगितले आहे .
पत्रकार परिषद मध्ये त्यांनी सांगितले की, नगरपालिकेच्या बैठकीत वारंवार अडथळे निर्माण केले जातात, माईक हिसकावून घेणे, निर्णय प्रक्रियेत अडथळे आणणे अशा प्रकारे कामकाजात अडचणी निर्माण केल्या जात आहेत. “मी सामान्य कुटुंबातील महिला असल्यामुळे मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे,” असा गंभीर आरोपही त्यांनी केला.भंगाळे पुढे म्हणाल्या की, विकासकामांसाठी त्या विविध मंत्र्यांकडे पाठपुरावा करत असून, जनतेच्या आशीर्वादाने त्या शांतपणे विकासकार्य पुढे नेत राहतील. त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याशी झालेल्या चर्चेचाही उल्लेख केला .
यावेळी उपस्थित असलेले नगरसेवक सचिन चौधरी यांनीही भाजपवर निशाणा साधत सांगितले की, “भुसावळचा खरा विकास संतोष चौधरी यांच्या कार्यकाळात झाला आहे असे सांगितले .तसेच, उल्हास पगारे यांनी आरोप केला की, भाजपच्या नगरसेवकांनी मुद्दाम जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून विकासकामे थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. “ही भूमिका शहराच्या हिताच्या विरोधात आहे,”दरम्यान, इतर पदाधिकाऱ्यांनीही विरोधकांवर जोरदार टीका करत, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे सांगितले.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे विकास रखडणार?
भुसावळमध्ये सुरू असलेल्या या वादामुळे शहराच्या विकासावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या दृष्टीने हा संघर्ष थांबून प्रत्यक्ष विकासकामांना गती मिळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.


