जळगाव प्रतिनिधी । जळगाव विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या जागेवर शिवसेनेचा दावा ठोकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या शुभेच्छा फलकांवर ‘भावी आमदार’ असा उल्लेख केल्याने राजकीय चर्चेला अधिकच उधाण आले आहे.
याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “जळगाव विधान परिषदेची जागा आधी शिवसेनेकडे होती आणि तिथे दोनदा शिवसेनेचा विजय झाला होता. त्यानंतर मागील दोन वेळा भाजपने ही जागा जिंकली. मात्र, आता जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेचे संख्याबळ जवळपास सारखेच आहे. त्यामुळे राज्य पातळीवर होणाऱ्या वाटाघाटीत ही जागा शिवसेनेला मिळावी, अशी विनंती आम्ही वरिष्ठांकडे करणार आहोत.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जागेबाबत अंतिम निर्णय घेतील, असे स्पष्ट करत असतानाच, त्यांनी ही जागा मिळवण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे ठामपणे सांगितले.
बागेश्वर महाराजांना सुनावले खडे बोल :
यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी बागेश्वर धाम महाराज यांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला. “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. ते काही नाणं नाही की कोणीही उठावे आणि त्यांचा वापर करावा. बागेश्वर महाराजांनी शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासावा. आमच्या अस्तित्वाचे कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यामुळे कुणीही असो, महाराजांपेक्षा मोठा नाही,” अशा शब्दांत त्यांनी बागेश्वर महाराजांना खडे बोल सुनावले.
मंत्रिमंडळ फेरबदल आणि संजय गायकवाड यांच्यावर भाष्य :
मंत्रिमंडळातील बदलांच्या चर्चांकडे दुर्लक्ष करत, आपल्याला मिळालेल्या जबाबदारीवर लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त विधानांवर भाष्य करताना, “आमदारांनी अशी विधाने टाळावीत ज्यामुळे आपला नेता किंवा पक्ष अडचणीत येईल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
एकीकडे महायुतीतील जागावाटपाचे समीकरण आणि दुसरीकडे पक्षातील नेत्यांना दिलेले सूचक सल्ले, यामुळे गुलाबराव पाटील यांच्या या विधानांनी जळगावच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली आहे. आता भाजप आणि शिंदे गट यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



