जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात सूर्याचा प्रकोप वाढत असून, वाढत्या तापमानाचा पहिला बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील तुकाराम वाडी परिसरात राहणाऱ्या लोधू नामदेव पाटील (वय ६०) या वृद्धाचा उन्हाच्या तीव्र फटक्यामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोमवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एसटी वर्कशॉपच्या भिंतीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.
मूळचे हिंगणे (ता. बोदवड) येथील रहिवासी असलेले लोधू पाटील सध्या जळगावमधील नेरी नाका परिसरातील तुकाराम वाडीत पत्नीसह राहत होते. ते एमआयडीसीतील एका दालमिलमध्ये कामाला होते. शनिवारी २५ एप्रिल रोजी गावात लग्नसमारंभ असल्याने ते हिंगणे येथे गेले होते. रविवारी सायंकाळी लग्न आटोपून ते बसने जळगावला परतले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्यांची शोधाशोध सुरू केली होती.
आज सकाळी कामावर जाणाऱ्या काही कामगारांना एसटी वर्कशॉपजवळ एक वृद्ध मृतावस्थेत पडलेले दिसले. त्यांची ओळख पटल्यानंतर एमआयडीसी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. आपल्या कर्त्या पुरुषाचा असा दुर्दैवी अंत झाल्याचे समजताच नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.
जळगाव जिल्ह्यात सध्या उष्णतेची लाट असून रविवारी तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. प्रवासादरम्यान उन्हाचा तीव्र तडाखा बसल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोधू पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.



