जळगाव प्रतिनिधी | शहरात विनापरवाना आणि अवैध मार्गाने वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पाऊले उचलली आहेत. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “विशेष शोध मोहिमे” अंतर्गत शनिपेठ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कोणतीही वैध कागदपत्रे नसताना भारतात घुसखोरी करून राहणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तिला आश्रय देणाऱ्या एका व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील भोई गल्ली, जोशी पेठ परिसरात एक परदेशी महिला बनावट ओळख लपवून राहत असल्याची खात्रीशीर माहिती शनिपेठ पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी १० मे रोजी संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी पोलिसांना त्या ठिकाणी कोणीका राणी शामलचंद्र राय (वय २०, मूळ रा. बांगलादेश) ही महिला मिळून आली.
पोलिसांनी संशयित महिलेकडे पासपोर्ट आणि व्हिसाबाबत चौकशी केली असता, तिच्याकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नाहीत. प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले की, सदर महिलेने सीमा ओलांडून चोरट्या मार्गाने भारतीय सरहद्दीत प्रवेश केला होता आणि ती गेल्या काही दिवसांपासून जळगावात अनधिकृतपणे राहत होती.
या प्रकरणात पोलिसांनी केवळ महिलेलाच नाही, तर तिला आश्रय देणाऱ्या चिन्मय जगन्नाथ वाला (रा. जळगाव, मूळ रा. पश्चिम बंगाल) यालाही आरोपी बनवले आहे. संबंधित महिला ही बांगलादेशी नागरिक असून ती बेकायदेशीरपणे राहत आहे, हे माहित असतानाही चिन्मयने ही माहिती पोलिसांपासून लपवून ठेवली आणि तिला निवारा दिला.
याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सूरी हे करत आहेत.
जळगाव पोलीस दलाकडून जिल्ह्यात अवैध वास्तव्य, बनावट कागदपत्रे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. “नागरिकांनी आपल्या परिसरात कोणीही संशयास्पद व्यक्ती आढळल्यास किंवा परदेशी नागरिक विनापरवाना राहत असल्याची माहिती असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



