यावल प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील यावल येथील ऐतिहासिक श्री महर्षी व्यास मंदिरात बुधवारी (दि. २९) गुरुपौर्णिमेनिमित्त भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, मंदिर परिसरात उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. धार्मिक परंपरा, सामाजिक उपक्रम आणि भक्तिमय वातावरणाचा संगम असलेल्या या उत्सवासाठी राज्यासह शेजारील राज्यांतूनही हजारो भाविक उपस्थित राहणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
भारतात महर्षी व्यासांची केवळ तीन मंदिरे असून, त्यापैकी महाराष्ट्रातील एकमेव मंदिर यावल येथे आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमेला येथे विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते. सकाळी ८ ते १० या वेळेत श्री महर्षी व्यासांची महापूजा होणार असून, त्यानंतर दिवसभर भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
यासाठी तब्बल २१ क्विंटल बुंदी आणि २५ क्विंटल तांदळापासून तयार करण्यात आलेला भात प्रसाद म्हणून वाटण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
यंदाच्या उत्सवात धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात येणार असून, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानही संस्थानतर्फे राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे.
महेलखेडी, कोरपावली, चितोडा, सांगवी, टाकरखेडा, बोरावल, राजोरा, दगडी, मनवेल, दहिगाव, मोहराळा आदी गावांतून टाळ-मृदुंगाच्या गजरात दिंड्या मंदिरात दाखल होणार आहेत. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता सुमारे १०० स्वयंसेवक तसेच यावल पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिराचे सुशोभीकरणही अंतिम टप्प्यात असून, आकर्षक सजावटीमुळे मंदिर परिसर अधिक देखणा दिसत आहे.
सन १९९४ मध्ये श्री व्यास मंदिर व श्रीराम मंदिर संस्थानाची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर १९९९ मध्ये करवीर पीठाचे शंकराचार्य श्री विद्याशंकर भारती यांच्या हस्ते भगवान वेदव्यासांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तेव्हापासून गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असून, यंदाही भाविकांनी शांततेत दर्शन घेऊन आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महर्षी व्यास मंदिर व श्रीराम मंदिर संस्थानतर्फे करण्यात आले आहे.



