जळगाव प्रतिनिधी । अमली पदार्थ मुक्त जिल्ह्यासाठी कटिबद्ध असलेल्या जळगाव पोलिसांनी आज एक मोठी कारवाई केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल असलेल्या २३ गुन्ह्यांमधील जप्त केलेला १३६२ किलो गांजा आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. बाजारमूल्यानुसार या गांजाची किंमत सुमारे २ कोटी ७२ लाख ४० हजार रुपये इतकी आहे.
न्यायालयीन आदेशाचे पालन
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि केंद्र सरकार तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या सूचनांचे पालन करून हा मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी या संपूर्ण प्रक्रियेचे नोडल अधिकारी म्हणून नियोजन केले.
पारदर्शक विल्हेवाट प्रक्रिया
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समितीने प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर आज ११ मे रोजी ही कारवाई करण्यात आली. जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत खड्डा खोदून, पर्यावरणाची किमान हानी होईल याची दक्षता घेत हा गांजा नष्ट करण्यात आला. या संपूर्ण प्रक्रियेचे पारदर्शकतेसाठी व्हिडीओ चित्रीकरण देखील करण्यात आले आहे.
समितीची उपस्थिती
या मोहिमेवेळी जिल्हा स्तरीय समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, सदस्य अपर पोलीस अधीक्षक संदिप गावीत, पोलीस उपअधीक्षक (गृह) प्रदीप ठाकूर, कृषी विभागाचे प्रतिनिधी विकास बोरसे आणि वजन मापे निरीक्षक राजेंद्र व्यवहारे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील संजय दोरकर, संदीप पाटील, जयंत चौधरी, अजय पाटील आणि रवींद्र चौधरी यांनी या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावली. जळगाव पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले असून, अंमली पदार्थांचे जाळे मुळापासून उपटून टाकण्याचा निर्धार पोलिसांनी व्यक्त केला आहे



