जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रस्ते अपघातांचे प्रमाण चिंताजनक वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, जळगाव पोलीस दलाने आता आक्रमक पवित्रा घेतला असून जिल्हा अपघातमुक्त करण्यासाठी १३ कलमी विशेष मोहीम आखली आहे. पोलीस अधिक्षक श्रीकांत ढिवरे यांनी आज सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ‘Target Zero’ निश्चित करण्यात आले.
या बैठकीला दोन्ही अपर पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी, वाहतूक शाखा आणि हायवे स्टेट पेट्रोलचे (HSP) अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
अशी असेल जळगाव पोलिसांची रणनीती:
पोलिसांनी एमआयडीसी क्षेत्रातील ट्रक चालक आणि ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, महामार्गावरील हॉटेल आणि ढाबा चालकांना ‘प्रथम उपचार’ आणि ‘सीपीआर’चे प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून अपघातानंतरचा ‘गोल्डन अवर’ वाचवता येईल.
कडक कारवाईचा इशारा:
लग्नसराईत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरणाऱ्या टेम्पोंवर आणि महामार्गाच्या कडेला अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या ट्रकवर आता कठोर कारवाई केली जाणार आहे. दारू पिऊन वाहन चालवणारे आणि अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी लक्ष्य केले आहे.
७५% जखमींना रुग्णवाहिका मिळत नाही!
जिल्ह्यातील अपघातांच्या आकडेवारीचा अभ्यास केला असता, ७५ टक्के जखमींना खासगी किंवा बिगर-रुग्णवाहिका वाहनांतून दवाखान्यात हलवण्यात आल्याचे समोर आले आहे. ही त्रुटी दूर करण्यासाठी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय, रस्ते बांधकामाच्या ठिकाणी डंपर चालकांना सूचना देणे आणि ‘ब्लॅक स्पॉट’चा अभ्यास करून उपाययोजना करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहेत.



