जळगाव (प्रतिनिधी): प्रेमप्रकरणातून घर सोडून गेलेल्या एका १९ वर्षीय तरुणाने जळगाव रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, १५ मे रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. गणेश कोळी असे मृत तरुणाचे नाव आहे. विशेष म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी आणि मृत्यूनंतर पोलीस येईपर्यंत या तरुणाचा आईसोबतचा कॉल सुरू होता, ज्यामुळे सर्व थरार मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळी याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. हे दोघेही ४ मे पासून घरातून निघून गेले होते. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. १५ मे रोजी सकाळी जळगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर दोघांनीही आपल्या नातेवाईकांना फोन करून आपण जळगावला आल्याची माहिती दिली. त्यानंतर तरुणीचा भाऊ जळगाव रेल्वेस्थानकावर येवून तिला घेऊन गेला.
तरुणीला तिचे नातेवाईक घेऊन गेल्यानंतर गणेशने आपल्या आईला शेवटचा फोन केला. इंस्टाग्रामवर तरुणीसोबतचा फोटो शेअर करून त्याने “माय वाईफ माय जान” असे स्टेटस ठेवले होते. आईशी बोलताना तो म्हणाला, “आई, मी मोठी चूक केली आहे. हा माझा तुला शेवटचा कॉल आहे.” एवढे बोलून त्याने छत्रपती शिवाजी नगर रेल्वे उड्डाणपुलाजवळ धावत्या रेल्वेखाली उडी घेतली. धक्कादायक बाब म्हणजे, उडी घेतल्यानंतरही त्याचा फोन सुरूच होता. रेल्वे पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांनी मोबाईल उचलला असता पलीकडून त्याची आई बोलत असल्याचे समोर आले.
या घटनेनंतर गणेशच्या नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मुलीच्या नातेवाईकांनी दबाव टाकून, शिवीगाळ करत कुटुंबाला संपविण्याची धमकी दिल्यामुळेच त्याने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन जोपर्यंत संशयित आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी या संदर्भात संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी ग्वाही दिली असून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



