जळगाव प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोळवद परिसरातून दोन मुलांसह ३२ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने यावल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिस नोंदीनुसार, माधुरी उमेश महाजन (वय ३२) या आपल्या दोन मुलांसह राहत होत्या. त्यांचा मोठा मुलगा विपुल (वय १३) तर लहान मुलगा कार्तिक (वय ६) आहे. काही कारणास्तव महिला आपल्या दोन्ही मुलांसह घरातून बाहेर गेल्यानंतर त्या पुन्हा घरी परतल्या नाहीत.
महिला आणि दोन्ही मुले बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक तसेच परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, तिघांबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर महिलेच्या पतीने यावल पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
अज्ञात व्यक्तीने महिलेला आणि तिच्या दोन्ही मुलांना फूस लावून अपहरण केल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास यावल पोलिसांकडून सुरू असून, महिला आणि दोन्ही मुलांचा शोध घेतला जात आहे.



