
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध पिकांची मोठी आवक सुरू झाली आहे.
जळगाव। रब्बी हंगामाच्या काढणीला सुरुवात होताच जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत विविध पिकांची मोठी आवक सुरू झाली आहे. यंदा गहू, हरभरा व मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली असली, मात्र यंदा सर्वाधिक चर्चेत आहे ते ‘दादर’ पीक. कमी लागवड आणि वाढती मागणी यामुळे दादरला विक्रमी दर मिळत असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
१६ मार्च रोजी बाजार समितीत दादरला शासनाच्या ₹३,४२१ हमीभावाच्या तुलनेत तब्बल ₹५,१०० प्रति क्विंटल दर मिळाला. म्हणजेच हमीभावापेक्षा सुमारे ₹२ हजारांनी अधिक भाव मिळाल्याने उत्पादक शेतकरी सुखावला आहे. यंदा दादरचे क्षेत्र कमी राहिल्याने बाजारात आवक मर्यादित आहे, पण मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरात जोरदार तेजी दिसून येत आहे. एका दिवसात सुमारे १७०० क्विंटल दादरची आवक झाली असून, वाढलेल्या भावामुळे बाजारात शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
दरम्यान, इतर पिकांचे दर तुलनेने स्थिर दिसत आहेत. हरभऱ्याला ४,८०० ते ५,००० रुपये दर मिळत असून, मेक्सिको हरभऱ्याला ८,६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. सोयाबीनला सुमारे ₹५,३४५ तर गव्हाला ₹२,३५० दर मिळत आहे. बाजार समिती प्रशासनाच्या मते, गहू, हरभरा आणि मक्याची लागवड यंदा मोठ्या प्रमाणात झाली असली, तरी दादरचे क्षेत्र कमी राहिल्यानेच या पिकाला मागणी वाढून दरात मोठी उसळी आली आहे.


