
शहरातील नाले आणि गटार तुंबतात, प्लास्टिकमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते,
भुसावळ प्रतिनिधी : पर्यावरण रक्षणाच्या उद्देशाने भारत सरकारने १ जुलै २०२२ पासून सिंगल-यूज प्लास्टिकवर पूर्ण बंदी घातली आहे. यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, पाण्याच्या बाटल्या, कप, प्लेटसह १२० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक कॅरीबॅगसारख्या वस्तूंचा वापर, विक्री आणि उत्पादन पूर्णपणे प्रतिबंधित आहे.
तरीही भुसावळ शहरात या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे पाहायला मिळते. भाजी, फळ, किराणा, मांस विक्री आणि अन्य ठिकाणी प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर सर्रास सुरू असून प्लास्टिकची विल्हेवाट लावणे कठीण झाले आहे. यामुळे शहरातील नाले आणि गटार तुंबतात, प्लास्टिकमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते, तसेच प्राणी व पक्ष्यांचे जीवनही प्रभावित होते.
यावर पायबंद घालण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भुसावळ शहराध्यक्ष दीपक सोनवणे, तालुकाध्यक्ष तुषार वाढे, तालुका सचिव विलास कोळी, तालुका उपाध्यक्ष दशरथ सपकाळे, सुशील मोरे यांसह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपमुख्याधिकारी परवेज शेख यांना निवेदन सादर केले. निवेदनात भुसावळ पालिका प्रशासनाने १२० मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिक उत्पादन, विक्री व वापर करणाऱ्यांवर तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.स्थानिकांचे म्हणणे आहे की, शहरात प्लास्टिक वापरावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा पर्यावरण आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.


