
गैरसोय लक्षात घेता केंद्र सरकारने पुरवठा व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत.
जळगाव । देशात एलपीजी सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता केंद्र सरकारने पुरवठा व्यवस्थापनासाठी तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आखाती देशांतून नैसर्गिक वायू घेऊन आलेली जहाजे भारतीय किनाऱ्यावर पोहोचली असून, पुढील दोन महिन्यांसाठी पुरेसा गॅस साठा उपलब्ध असल्याचा सरकारचा दावा आहे.
दरम्यान, गॅस वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने बुकिंग प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, एका ग्राहकाला महिन्यात जास्तीत जास्त दोनच घरगुती सिलेंडर बुक करता येणार आहेत. तसेच दोन बुकिंगमध्ये किमान २५ दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास बुकिंग स्वीकारले जाणार नाही.
याशिवाय, एका आर्थिक वर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) ग्राहकांना एकूण १५ सिलेंडरचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांना समान आणि नियमित पुरवठा सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जर एखाद्या ग्राहकाचा वार्षिक कोटा पूर्ण झाला आणि तरीही अतिरिक्त सिलेंडरची गरज भासली, तर त्यासाठी ‘Hello BPCL’ या अधिकृत मोबाईल ॲपद्वारे विशेष पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कुटुंबातील सदस्यसंख्या, विशेष कार्यक्रम किंवा पाहुण्यांची संख्या यासंबंधी माहिती दिल्यानंतरच अतिरिक्त सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला जाईल.
सरकारच्या माहितीनुसार, सध्या देशाकडे सुमारे ६० दिवसांचा गॅस साठा उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर काही अडचणी निर्माण झाल्या असल्या, तरी ४० हून अधिक देशांकडून भारताला गॅस पुरवठा सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या काळात परिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माध्यमातूनच गॅस बुकिंग करावे आणि वितरणाची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


