
महापौरांच्या पुढाकाराने दि. 2 एप्रिलपासून सुरू झालेले विशेष स्वच्छता अभियान रविवारी पूर्ण झाले.
महापौर दीपमाला काळे यांच्या मार्केट साफसफाई अभियान अंतर्गत आणि शहरातील जुन्या व नवीन बी. जे. मार्केटच्या दुरावस्थेबाबत महासभेत नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर, महापौर दीपमाला काळे यांनी या विषयाची गंभीर दखल घेत प्रत्यक्ष कृतीवर भर दिला आहे. महापौरांच्या पुढाकाराने दि. 2 एप्रिलपासून सुरू झालेले विशेष स्वच्छता अभियान रविवारी पूर्ण झाले. गेल्या चार दिवसांच्या सातत्यपूर्ण कामामुळे मार्केट परिसराचे रूप पालटले असून नागरिकांकडून या मोहिमेचे स्वागत होत आहे.
केवळ स्वच्छताच नव्हे, तर मार्केटचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महापौरांनी महापालिकेच्या विविध विभागांना कामाचे निर्देश दिले होते. त्यानुसार गेल्या चार दिवसांत महत्त्वाची कामे हाती घेण्यात आली. 20 महिला व 15 पुरुष कामगारांच्या मदतीने मार्केटचा कानाकोपरा स्वच्छ करण्यात आला.
मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेले अडथळे आणि अतिक्रमणे हटवण्यात आली. संपूर्ण परिसरात बंद असलेले दिवे सुरू करून नवीन प्रकाश व्यवस्था करण्यात आली. तसेच लिफ्ट कशी बसवता येईल याबाबत पाहणी करण्यात आली तुटलेल्या रेलिंग्स आणि पायऱ्यांच्या दुरुस्तीचे नियोजन सुरू झाले आहे.
या मोहिमेदरम्यान महापौर दीपमाला काळे यांनी मार्केटमधील व्यापाऱ्यांशी संवाद साधला. प्रशासनाने स्वच्छतेचा पुढाकार घेतला असला, तरी ही व्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी नागरिकांची आणि दुकानदारांची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानाबाहेर कचराकुंडी ठेवावी आणि ग्राहकांनी त्यातच कचरा टाकेल याची दक्षता घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. माझे मार्केट, स्वच्छ मार्केट ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या स्वच्छता मोहिमेच्या समारोपप्रसंगी सहायक आयुक्त उदय पाटील, मुख्य स्वच्छता समन्वयक रमेश कांबळे, मुख्य स्वच्छता निरीक्षक मुकेश पाटील, स्वच्छता निरीक्षक महेश ठाकूर, युनिट प्रमुख अजय चांगरे, वार्ड मुकादम विशाल चांगरे, नितीन जावळे आणि बीव्हीजी सुपरवायझर संदीप शर्मा यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


