
दरवाढीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे ९० ते १०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
जळगाव । उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) १५ एप्रिलपासून तिकीट दरात १० टक्क्यांची हंगामी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्यांमध्ये गावाला जाताना प्रवाशांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. या दरवाढीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे ९० ते १०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.
महामंडळाच्या आदेशानुसार, वाढीव दर उन्हाळी हंगामात वाढणारी प्रवासी संख्या आणि उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने लागू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही दरवाढ केवळ साध्या, मिडी आणि जलद बस सेवांसाठी लागू असणार आहे. शिवनेरी, शिवशाही आणि ई-बस सेवांच्या तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याने या बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, विद्यार्थी पास आणि मासिक पासधारकांना या दरवाढीतून सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
जळगावहून प्रमुख शहरांसाठी नवे अंदाजे भाडे:
जळगाव – पुणे : ६७४ वरून ७६३ रुपये
जळगाव – धुळे : १६२ वरून १७८ रुपये
जळगाव – नाशिक : ४३३ वरून ४७६ रुपये
जळगाव – छत्रपती संभाजीनगर : २८२ वरून ३१० रुपये
जळगाव-अकोला : ३३३ वरून ३६६ रुपये
जळगाव – चाळीसगाव : १७२ वरून १८९ रुपये
जळगाव – मुक्ताईनगर : ११२ वरून १२३ रुपये


