भुसावळ प्रतिनिधी | सध्या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासह भुसावळ शहरात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमानाचा पारा ४५ अंशांच्या पुढे सरकला आहे. या भीषण उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले असतानाच, निसर्गातील मुक्या पशु-पक्ष्यांची पाण्यासाठी मोठी वणवण होत आहे. हीच बाब लक्षात घेऊन भुसावळ येथील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने ‘जीव दया जल सेवा’ अभियान राबवण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
उन्हाळ्यात पक्ष्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे, यासाठी शाळेच्या प्राचार्या नीना कटलर, उपप्राचार्या मनप्रीत कौर अरोडा आणि श्रद्धाली घुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. शाळेच्या गच्चीवर, परिसरातील झाडांवर आणि सावलीच्या ठिकाणी मातीची भांडी ठेवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, या भांड्यांमध्ये दररोज स्वच्छ पाणी भरले जाणार असून पक्ष्यांच्या पिण्यासोबतच त्यांच्या आंघोळीसाठीही उत्तम सोय करण्यात आली आहे.
या मोहिमेत इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला. शाळेतील पर्यावरण मंडळाच्या सदस्यांनी या पाणवठ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दररोज सकाळी या भांड्यांमधील पाणी बदलणे आणि ती स्वच्छ ठेवण्याचे काम हे विद्यार्थी करणार आहेत.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्या नीना कटलर म्हणाल्या की, “मुक्या प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर दया करणे हीच खरी माणुसकी आहे. उन्हाळ्याच्या कठीण काळात निसर्गाचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे.” त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या घराच्या गॅलरीत किंवा अंगणात पक्ष्यांसाठी किमान एक भांडे पाणी ठेवण्याचे आवाहनही केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुकेश कोळी, आकाश परदेशी, डॅनियल पवार, महेंद्र सूर्यवंशी, सोनाली मुजुमदार आणि हर्षला पाटील या शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. ताप्ती स्कूलच्या या संवेदनशील उपक्रमाचे भुसावळ शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.



