जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत कामावर असताना दुसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दीपक छगन भिल (रा. जळगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे. मात्र, या मृत्यूनंतर पोलीस प्रशासन आणि रुग्णालयाने नातेवाईकांना विश्वासात न घेताच पोस्टमार्टम उरकल्याचा गंभीर आरोप केल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक भिल हा एमआयडीसीमधील एका कंपनीत कार्यरत असताना अचानक दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. यात त्याला गंभीर दुखापत झाल्याने तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. दीपकचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून त्याचे पोस्टमार्टम (शवविच्छेदन) केले. मात्र, ही प्रक्रिया करताना नातेवाईकांना कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा दावा कुटुंबाने केला आहे. “आम्हाला कोणतीही माहिती न देता पोस्टमार्टम कसे केले? पंचनाम्याच्या वेळी आम्हाला का बोलावले नाही?” असे संतप्त सवाल नातेवाईकांनी उपस्थित केले आहेत.
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
दीपकचा मृत्यू अपघाती नसून तो संशयास्पद असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ पोलीस आणि नातेवाईकांमध्ये शाब्दिक चकमक देखील उडाली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



