सावदा प्रतिनिधी । शहराच्या मध्यवर्ती भागात राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी उभारण्यात आलेला स्तंभ दुर्लक्षित राहिल्याने नागरिक आणि देशप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या रिकाम्या स्तंभाकडे पाहून राष्ट्रध्वजाचा अवमान होत असल्याचा आरोप करत, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत तायडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सावदा नगरपालिकेसमोर चक्क ‘भीक मांगो’ आंदोलन करून प्रशासनाची झोप उडवली. या अनोख्या आंदोलनानंतर नमलेल्या प्रशासनाने पुढील तीन दिवसांत या स्तंभावर तिरंगा फडकवण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
सावदा शहरातील सार्वजनिक ठिकाणी मोठ्या अभिमानाने राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी स्तंभ उभारण्यात आला आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून या स्तंभावर राष्ट्रध्वज लावलेला नाही. हा रिकामा स्तंभ प्रशासकीय उदासीनतेचे प्रतीक ठरत असल्याचा आरोप करत, तायडे यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला. या आंदोलनाने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले असून, राष्ट्रप्रेमाच्या मुद्द्यावर नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या तीन दिवसांच्या आत जर या स्तंभावर सन्मानाने राष्ट्रध्वज तिरंगा फडकवला गेला नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल. याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या लक्षवेधी आंदोलनाची सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून, हा तांत्रिक किंवा प्रशासकीय प्रश्न येत्या तीन दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिले आहे. लवकरच स्तंभावर तिरंगा फडकवला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
या आंदोलनात रमाकांत तायडे यांच्यासह त्यांचे अनेक सहकारी आणि जागरूक नागरिक सहभागी झाले होते. प्रशासनाच्या या ग्वाहीनंतर आता तीन दिवसांत तिरंगा फडकतो का? याकडे संपूर्ण सावदा शहराचे लक्ष लागले आहे.



