जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात गणेशोत्सवाचे आगमन अवघ्या चार दिवसांवर आले असून, सार्वजनिक गणेश मंडळांच्या तयारीला आता वेग आला आहे. शहरातील विविध भागांमध्ये मंडप उभारणी, सजावट, विद्युत रोषणाई तसेच इतर कामे अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत.
गणरायाच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांची लगबग सुरू असून, रात्री उशिरापर्यंत मंडप उभारणीचे काम सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मात्र यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट असल्याचे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मंडप, गणेशमूर्ती, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाई आणि मजुरांची मजुरी यासह विविध खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना यंदा तब्बल २५ ते ३० टक्के अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मंडळांकडून विविध उपक्रमांचे नियोजन केले जात असले, तरी वाढत्या खर्चामुळे बजेटचे गणित बिघडले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सार्वजनिक गणेश मंडळांना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेतेही वाढ करावी, अशी मागणी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
एकीकडे गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू असताना दुसरीकडे वाढत्या महागाईमुळे मंडळांसमोरील आर्थिक आव्हानही वाढले आहे.



