
प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारल्यास यश हमखास
जळगाव प्रतिनिधी : प्रामाणिकपणा, अथक परिश्रम व विनम्रता हे तीन गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारले तर त्यांना जीवनात यश हमखास मिळू शकेल त्याकरीता नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांना उत्कृष्ठ नागरिक बनविण्यास सहाय्यक ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे संचालक प्रा. गणेशन कन्नबीरन यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठात दीक्षांत समारंभात केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठाचा ३४ वा दीक्षांत समारंभ मंगळवार दि. २३डिसेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. या समारंभात दीक्षांत भाषण करतांना प्रा. गणेशन कन्नबीरन बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, कुलसचिव डॉ.विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा.योगेश पाटील तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सर्वश्री राजेंद्र नन्नवरे, प्रा. अनिल डोंगरे, प्रा. साहेबराव भूकन, प्राचार्य जगदीश पाटील, प्राचार्य एस.आर. राजपूत, प्रा.जे.व्ही. साळी, प्राचार्य संजय सुराणा, प्रा. शिवाजी पाटील, प्रा. सुरेखा पालवे, नितीन झाल्टे, प्रा. महेंद्र रघुवंशी, डॉ.पवित्रा पाटील, डॉ. पराग मसराम, सीए रवींद्र पाटील हे उपस्थित होते.
प्रा. गणेशन कन्नबीरन हे पुढे बोलतांना म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे भारताची आताची शैक्षणिक प्रणालीत व उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावला आहे. भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील चौथी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे आपण आता नोकरी शोधण्यापेक्षा नोकरी देण्यावर भर दिला पाहिजे. पारंपरिक शिक्षण पद्धती ही ज्ञानावर आधारित संकल्पना व सिद्धांतांवर भर देत असे आणि क्वचितच कौशल्य, नोकरी संशोधन व नवउपक्रमासाठी ज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण करतील परंतु नवीन शैक्षणिक धोरणाने हा ट्रेंड बदललेला आहे. ज्यामध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेशन, फील्डवर्क आंतरवासियताच्या माध्यमातून व वास्तविक जगातील समस्यांवर आधारित प्रकल्प इत्यादीवर भर दिलेला आहे.
आजच्या काळात नोकऱ्या हया केवळ शैक्षणिक पात्रतेपेक्षा कौशल्यांशी अधिक प्रमाणात जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे नोकरीसाठी आवश्यक कौशल्यांचा विकास हा अभ्यासक्रम रचना व अंमलबजावणीचा अविभाज्य भाग असणे गरजेचे आहे. नोकरीचे कौशल्य मुख्यत्वे दोन प्रकारचे असतात सॉफ्टस्किल व हार्डस्किल, हार्डस्किल मध्ये निवडलेल्या अभ्यासक्रमांशी संबंधित मूलभूत विषयक कौशल्यांवर लक्ष केंद्रित करतात तर सॉफ्टस्किल हे हार्डस्किल्सना पूरक व सहाय्यक असतात. नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ बौद्धिक विकासापुरते मर्यादित नसून चारित्र्य घडविणे आणि सर्वांगीण संतुलित माणसे घडविणे हेही आहे.
आजच्या काळाची गरज म्हणजे जागतिक नागरिकत्व यावर आधारित सामाजिक कौशल्य विकसित करणे हा होय, विशेषतः भारत आर्थिक दृष्ट्या प्रगती करत असताना भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. त्यात वेगवेगळ्या भाषा संस्कृती हवामानाची परिस्थिती चांगली आहे. आपण एक राष्ट्र म्हणून एकत्र आहोत. विद्यार्थ्यांना जागतिक समस्या समजून घेण्यास सक्षम करणे आणि समावेशक सहिष्णू सुरक्षित व शाश्वत समाज घडविण्यासाठी त्यांना सक्रिय बनवणे ही आपली गरज आहे. जागतिक नागरिकत्व सर्वांगीण शिक्षणाचा अविभाज्य भाग म्हणून विकसित होतो आणि नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार विविध स्वरूपात साध्य केले जाते असेही प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.


