भडगाव प्रतिनिधी | भडगाव तालुक्यातील भारवडे येथे शेतातील मक्याच्या पिकाची नासधूस केल्याप्रकरणी १३ जणांविरुद्ध भडगाव पोलिस ठाण्यात दंगल, बेकायदेशीर जमाव जमवणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि धमकावने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अनिल दयाराम पाटील यांच्या शेतात संशयितांनी एकत्र येत मक्याची कणसे तोडून पिकाचे नुकसान केल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या कुटुंबीयांना विरोध केल्यामुळे शिवीगाळ करून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून भडगाव पोलिसांनी १३ संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील दंगल, बेकायदेशीर जमाव, मालमत्तेचे नुकसान आणि धमकीसह विविध कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.



