
दोन ठाकरे पक्षांची युती झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन ठाकरे बंधू म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांची युती झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या ऐतिहासिक निर्णयाचे पडसाद जळगावात उमटले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने जळगाव शहरात मोठ्या प्रमाणावर जल्लोष साजरा करण्यात आला.जळगावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासमोर मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते.

यावेळी कार्यकर्त्यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र फोटोंचे बॅनर हातात घेऊन ‘युती’च्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत मनसे सैनिकांनी आपला आनंद व्यक्त केला.उत्साह मोठा, पण ठाकरे गटाची पाठ?
या जल्लोषात मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नवा उत्साह संचारला आहे. ही युती महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल.” मात्र, या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे स्थानिक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते उपस्थित नसल्याचे दिसून आले.
या अनुपस्थितीबद्दल विचारले असता, देशपांडे यांनी स्पष्ट केले की, “स्थानिक पातळीवरील ठाकरे गटाच्या नेत्यांशी आमचा संपर्क सुरू आहे. समन्वय साधून लवकरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे मोठे शक्तिप्रदर्शन आणि जल्लोष करतील.


