जळगाव प्रतिनिधी । जळगावच्या ममुराबाद रोडवरील चर्चित बोगस कॉल सेंटर प्रकरणात अडकलेले माजी महापौर ललित कोल्हे यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कारागृहात असलेल्या कोल्हे यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला असून, यामुळे त्यांची कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयाने त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांनी ममुराबाद रोडवरील एल. के. फार्महाऊसवर धाडसी कारवाई करत एका बोगस आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरचा पर्दाफाश केला होता. परदेशी नागरिकांना लक्ष्य करून त्यांची ऑनलाइन फसवणूक आणि लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार या कारवाईतून समोर आला होता. या प्रकरणात ललित कोल्हे यांच्यासह कोलकात्यातील चार मुख्य संशयित आणि इतर अशा एकूण आठ जणांना पोलिसांनी अटक केली होती.
तपासादरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी हा गुन्हा केवळ आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नसून तो ‘संघटित गुन्हेगारी’चा (मोका सदृश) प्रकार असल्याचे पुराव्यानिशी न्यायालयासमोर मांडले होते. यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य प्रचंड वाढले होते. या गंभीर आरोपामुळेच यापूर्वी जळगाव जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाने ललित कोल्हे यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते.
खालच्या न्यायालयांतून जामीन न मिळाल्याने कोल्हे यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने ललित कोल्हे यांचा जामीन अर्ज मंजूर केला. या निर्णयामुळे दीर्घकाळ नाशिक मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कोल्हेंना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, जामिनावर मुक्त झाल्यानंतर या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया कशा प्रकारे पार पडते, याकडे संपूर्ण जळगावकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.



