जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहराच्या मुख्य मार्गांवर वाहतुकीचा खोळंबा करणाऱ्या अनधिकृत बांधकामे आणि हातगाड्यांविरुद्ध जळगाव महानगरपालिकेने पुन्हा एकदा कठोर पवित्रा घेतला आहे. मंगळवारी, २८ एप्रिल रोजी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहराच्या मध्यवर्ती भागातील ‘अजिंठा चौक ते कालिंका माता मंदिर’ या मार्गावर धडक कारवाई केली.
गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणावर हातगाड्या, टपऱ्या आणि अनधिकृत दुकानांचा विळखा पडला होता. राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या या परिसरामुळे नागरिकांना वाहतुकीच्या मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत होता. आज सकाळी महापालिकेचे पथक जेसीबी आणि क्रेनसह या परिसरात दाखल झाले. पथकाने अत्यंत वेगाने कारवाई करत रस्ता अडवणाऱ्या सर्व टपऱ्या आणि हातगाड्या जप्त केल्या. या कारवाईमुळे रस्ता आता पूर्णपणे मोकळा झाला असून, वाहनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून महापालिकेची ही विशेष मोहीम संपूर्ण शहरात सुरू आहे. शहरातील वर्दळीच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे पूर्णपणे हटवून रस्ते प्रशस्त करणे, हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या कारवाईबद्दल माहिती देताना अतिक्रमण विभागाचे अधिक्षक संजय ठाकूर यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, “वाहतूक व्यवस्था विस्कळीत करणाऱ्या कोणत्याही अतिक्रमणाची गय केली जाणार नाही. आजची कारवाई ही याच व्यापक मोहिमेचा एक भाग आहे. शहरातील ज्या ज्या ठिकाणी अतिक्रमण आढळेल, तिथे ही मोहीम यापुढेही सातत्याने आणि कठोरपणे सुरूच राहील. नागरिकांनीही रस्त्यावर अतिक्रमण न करता सहकार्य करावे.”
या धडक कारवाईमुळे आता अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, रस्ते मोकळे झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.



