जळगाव प्रतिनिधी | आगामी काळातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि मालाविषय गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात विशेष नाकाबंदी मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली शुक्रवारी ८ मे रोजी रात्री ६ ते ११ या पाच तासांच्या कालावधीत ही धडक कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळाचे अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा आणि जिल्ह्यातील सर्व विभागीय शाखांचे अधिकारी सहभागी झाले होते. एकूण ३९ पोलीस अधिकारी आणि १९२ पोलीस अंमलदारांनी जिल्ह्यातील विविध संवेदनशील पॉईंट्सवर नाकाबंदी लावून वाहनांची कसून तपासणी केली.
पाच तासांच्या या मोहिमेत पोलिसांनी एकूण ३९९ केसेस नोंदवल्या असून, वाहनधारकांकडून ३ लाख ५८ हजार २५० रुपये इतका दंड आकारला आहे. कारवाईचा तपशील पाहता, सर्वाधिक कारवाई ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्या १०६ चालकांवर करण्यात आली. त्यापाठोपाठ विना लायसन्स वाहन चालवणारे ९४, विना नंबर प्लेटचे ७८ आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ४४ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’च्या ८ केसेस करण्यात आल्या असून एका वाहनावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
जिल्ह्यात गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. भविष्यातही अशाच प्रकारची आकस्मिक नाकाबंदी सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.



