जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरासह जिल्ह्यात इंधन टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मंगळवारी सकाळपासून जळगाव शहरातील विविध पेट्रोल पंपांवर डिझेल भरण्यासाठी वाहनचालकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी ट्रक, खासगी वाहने, दुचाकी तसेच मालवाहतूक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पेट्रोलचाही तुटवडा जाणवत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. काही पेट्रोल पंपांवर मर्यादित प्रमाणात इंधन उपलब्ध असल्याने वाहनधारकांची झुंबड उडाली. तर अनेक पंपांवर “डिझेल उपलब्ध नाही” तसेच “पेट्रोल व डिझेल उपलब्ध नाही” असे फलक लावण्यात आल्याने नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव आणि इराण-इराक-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीचा परिणाम शेतकरी, व्यापारी, प्रवासी आणि दैनंदिन कामासाठी वाहनांवर अवलंबून असलेल्या नागरिकांवर होत आहे.
दरम्यान, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे. परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी तेल कंपन्यांनी पुरवठा वाढवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



