जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर आणि जिल्ह्यात मोकाट तसेच पिसाळलेल्या कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसेंदिवस वाढत चालला असून, अत्यंत धक्कादायक घटनेत रेबीजमुळे दोघा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. कुत्र्याच्या चाव्यानंतर उपचारात झालेला हलगर्जीपणा या रुग्णांच्या जीवावर बेतल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील रहिवासी शेख ताहेर शेख फारुख आणि मुक्ताईनगर तालुक्यातील घोडगाव येथील प्रदीप उत्तम धायडे अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. पिंप्राळा हुडको परिसरात काही दिवसांपूर्वी एका पिसाळलेल्या कुत्र्याने सात ते आठ जणांवर अचानक हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ताहेर शेख यांचा महिनाभरानंतर रेबीजची लक्षणे दिसल्याने उपचारेदरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे, प्रदीप धायडे यांनाही कुत्र्याने चावा घेतला होता, मात्र त्यांनी योग्य उपचार आणि वेळेवर अँटी-रेबीज लस न घेतल्याने त्यांचाही मृत्यू झाला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी या दोन्ही मृत्यूंना रेबीज कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे.
रुग्णालयातील धक्कादायक आकडेवारी :
जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून समोर आलेली आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. रुग्णालयात दररोज सरासरी ३५ ते ४० नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी (डॉग बाईट) ठरून उपचारासाठी येत आहेत. हा आकडा महिन्याला तब्बल ८०० ते ८५० रुग्णांच्या घरात जातो. यावरून जिल्ह्यातील मोकाट कुत्र्यांची समस्या किती गंभीर बनली आहे, हे अधोरेखित होते.
नागरिक आणि लोकप्रतिनिधींचा मनपावर रोष :
या जीवितहानीनंतर जळगाव शहरातील नागरिक आणि नगरसेवकांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. महापालिका मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असल्याचा थेट आरोप नागरिकांनी केला आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ ‘सदोष मनुष्यवधाचा’ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आक्रमक मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासन आता तरी जागे होऊन ठोस कारवाई करणार का? , याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



