जळगाव प्रतिनिधी | देशात आणि राज्यात सातत्याने वाढणारी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसची दरवाढ, तसेच ‘स्मार्ट मीटर’च्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची होणारी कथित लूट याविरोधात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जळगावात तीव्र आंदोलन करण्यात आले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत अनोखे ‘धक्का मारो’ आंदोलन केले आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांचा तीव्र निषेध नोंदवला.
हे आंदोलन बहुजन मुक्ती पार्टीच्या देशव्यापी आंदोलनाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आले होते. आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून, त्यातच आता स्मार्ट मीटर सक्तीच्या नावाखाली वीज ग्राहकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
”सर्वसामान्य जनता महागाईच्या खाईत होरपळत असताना सरकार मात्र मूठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी निर्णय घेत आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले आहेत आणि आता स्मार्ट मीटरच्या माध्यमातून गरिबांच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम सुरू आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया बहुजन मुक्ती पार्टीच्या पदाधिकारी सुमित्रा अहिरे व सुनील देडे यांनी दिली.
आंदोलनाच्या शेवटी बहुजन मुक्ती पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. इंधन दरवाढ त्वरित मागे घेण्यात यावी आणि स्मार्ट मीटरची सक्ती तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. या आंदोलनात पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



