जळगाव प्रतिनिधी | धुळे-सुरत महामार्गावर एसटी महामंडळाच्या दोन बसेसचा अत्यंत भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून, एसटी बसचे चालकही यात दगावले आहेत. याशिवाय ३३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जामनेर बस स्थानकातून सकाळी साडेसात वाजता निघालेली जामनेर-सुरत एसटी बस दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास गुजरात मधील बारडोली जवळ आली असता हा अपघात झाला.
अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला, ज्यामुळे ही दुर्घटना अधिक भीषण झाली.
या दुर्घटनेनंतर जळगावचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी तातडीने सूत्रे हलवली आहेत. जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातामध्ये कुऱ्ह (ता. भुसावळ) येथील रहिवासी असलेल्या एसटी बस चालकाचा मृत्यू झाला आहे. बसमधील ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह मोठ्या प्रमाणात भाजल्यामुळे त्यांची ओळख पटवणे अत्यंत कठीण जात आहे. यासाठी प्रशासनाने आता ‘डीएनए’ (DNA) चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
सध्या बारडोली येथील सरदार पटेल आणि ओम साई हॉस्पिटलमध्ये ३३ जखमी प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. जळगाव जिल्हा प्रशासनाने सुरतचे जिल्हाधिकारी आणि बारडोलीच्या एसडीएम (SDM) यांच्याशी सतत संपर्क ठेवला आहे. एसटी महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींच्या उपचाराची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जे प्रवासी सुखरूप आहेत किंवा उपचारानंतर ज्यांना परत आणायचे आहे, त्यांच्यासाठी जळगाव प्रशासनाकडून विशेष वाहनांची व्यवस्था केली जात आहे.
पंतप्रधान निधीतून आर्थिक मदत जाहीर
या अत्यंत वेदनादायी घटनेवर राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मृत प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी केंद्र सरकारकडून तातडीने मदत जाहीर केली आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना पंतप्रधान सहाय्यता निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे.



