जळगाव प्रतिनिधी | शेतीसमोरील आव्हाने, बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारपेठेतील चढ-उतार अशा अनेक अडचणी आज कृषी क्षेत्रासमोर उभ्या आहेत. मात्र, या अडचणींना न घाबरता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, योग्य नियोजन आणि नावीन्यपूर्ण प्रयोग केल्यास शेती अधिक फायदेशीर व शाश्वत करता येते. अशा वेळी शेती ही कोणत्याही उद्योग किंवा नोकरीपेक्षा श्रेष्ठ ठरते, असा विश्वास प्रगतशील शेतकऱ्यांनी युवा पिढीला दिला. जैन हिल्स येथे सुरू असलेल्या ‘फ्युचर ॲग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया’ (फाली) या अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत उत्साहवर्धक संवाद रंगला.
संध्याकाळच्या सत्रात स्वप्नाताई चौधरी, अभिजीत शेळके, पद्माकर पाटील, यश चौधरी आणि राजू चौधरी या प्रयोगशील शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवकथनातून विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील नव्या संधी आणि उद्योजकतेची माहिती दिली. शिरपूरच्या स्वप्नाताई चौधरी यांनी, “नवतंत्रज्ञान आणि कष्टाची जोड दिल्यास शेती नक्कीच परवडते; म्हणूनच मी नोकरी करणाऱ्या पतीऐवजी शेतकरी पतीची निवड केली,” असे सांगत शेतीची प्रतिष्ठा वाढवली. जामनेरचे युवा शेतकरी अभिजीत शेळके यांनी परिवारात राहून नोकरीपेक्षा शेतीला प्राधान्य दिल्याचा अनुभव मांडला. तरडी येथील पद्माकर पाटील यांनी पपई व केळीच्या यशस्वी प्रयोगांची माहिती दिली. नशिराबादच्या यश चौधरी या तरुण कृषी पदवीधराने नोकरीमागे न धावता, जैन इरिगेशनच्या उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून डाळिंब, टिश्यू कल्चर केळी आणि सोयाबीनचे घेतलेले भरघोस उत्पादन उपस्थितांना थक्क करून गेले.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी जैन हिल्स कृषी संशोधन केंद्र, ठिबक सिंचन डेमो, अल्ट्रा हाय डेंसिटी प्लांटेशन, एअर आलू आणि टिश्यू कल्चर प्रकल्पांना भेटी दिल्या. ‘हायटेक प्लॉट फॅक्टरी’मधील रोपांची निर्मिती प्रक्रिया पाहून विद्यार्थी प्रभावित झाले. या उपक्रमाला जैन इरिगेशन, गोदरेज ॲग्रोव्हेट, यूपीएल, आयटीसी, स्टारअॅग्री आणि एसबीआय फाउंडेशन यांसारख्या नामांकित कंपन्यांचे सहकार्य लाभले असून, या संवादामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी क्षेत्रात करिअर करण्याची नवी दिशा मिळाली आहे.



