जळगाव प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि प्रचंड वेगाच्या वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणावर हाहाकार माजवला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका कडगाव शिवारातील ‘मेघा इंजिनिअरिंग कंपनी’च्या सौर ऊर्जा प्रकल्पाला बसला असून, येथे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. वादळाचा वेग इतका तीव्र होता की, प्रकल्पातील अनेक सोलर पॅनल्स मुळासकट उखडून पडले, तर काही पॅनल्स थेट हवेत उडून गेले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या वादळात अनेक पॅनल्स एकमेकांवर आदळल्यामुळे पूर्णपणे फुटून नष्ट झाले आहेत. पॅनल्सना भक्कम आधार देणारे लोखंडी स्ट्रक्चर्स आणि इतर अत्याधुनिक तांत्रिक उपकरणेही वाकल्यामुळे येथील यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. या गंभीर दुर्घटनेमुळे सौर ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया तात्काळ थांबवावी लागली असून, परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाला होता.
सुदैवाने या संपूर्ण दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, मुख्य संरचनेचे अतोनात नुकसान झाल्याने कंपनीला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सध्या युद्धपातळीवर दुरुस्ती आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्तपणे नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, प्रत्येक साहित्याची तपशीलवार नोंद घेतली जात आहे. या अवकाळी संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.



