जळगाव प्रतिनिधी | जळगाव महानगरपालिका प्रशासनात मोठी खळबळजनक घडामोड समोर आली आहे. मनपाचे विद्यमान आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची अखेर प्रशासकीय सेवेतून बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी आता नवे आयुक्त म्हणून आदित्य जीवने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने या संदर्भातील आदेश जारी केले असून, या खांदेपालटामुळे जळगावच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
माजी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांचा जळगाव मनपातील कार्यकाळ कमालीचा वादग्रस्त ठरला होता. त्यांच्या प्रशासकीय कार्यकाळात जळगाव शहरातील रस्ते, पाणी आणि मूलभूत विकास कामांबाबत नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत्या. ढेरे यांनी घेतलेल्या अनेक प्रशासकीय निर्णयांवरून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जनतेमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. अनेक विकासकामांच्या फायली रेंगाळल्याने आणि वादग्रस्त निर्णयांची मालिका सुरूच राहिल्याने, अखेर त्यांची ही बदली करण्यात आल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, गेल्या चार महिन्यांपूर्वी जळगाव महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची (भाजप) सत्ता आली आहे. सत्तेवर आल्यापासून भाजपच्या माध्यमातून शहरातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याचा आणि शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आता नवे आयुक्त आदित्य जीवने यांच्या खांद्यावर जळगाव मनपाची धुरा सोपवण्यात आली आहे.
नूतन आयुक्त आदित्य जीवने यांच्या नियुक्तीमुळे जळगावकरांच्या अपेक्षा प्रचंड उंचावल्या आहेत. शहरातील प्रलंबित प्रश्न, रस्त्यांची दुरवस्था आणि प्रशासकीय संथपणा दूर करणे हे त्यांच्यासमोरील मुख्य आव्हान असेल. आता नव्या आयुक्तांच्या कार्यकाळात जळगाव शहरातील विकासकामांना खरोखरच गती मिळणार की परिस्थिती ‘जैसे थे’ राहणार, हे येणारा काळच ठरवेल.



